वाशिम जिल्ह्यातील लोणी सखाराम महाराज येथील सखाराम महाराज विद्यालय येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अंतर्गत देशभक्ती जागृत करणारा उपक्रम
लोणी : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आज लोणी येथील श्री सखाराम महाराज विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा भावस्पर्शी उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत मातृभूमीचे रक्षण करणारे आपले जवान रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या कुटुंबीयांपासून दूर असतात. बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याचे सुख त्यांना प्रत्येक वेळी अनुभवता येत नाही. मात्र, आपल्या भावना आणि प्रेमाची राखी त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपणही त्यांच्या सोबत रक्षाबंधन साजरे करू शकतो, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सैनिकांसाठी प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीच्या भावना व्यक्त करणाऱ्या राख्या तयार केल्या. या राख्यांच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना ‘देशातील प्रत्येक नागरिक आपल्या पाठीशी आहे’ हा विश्वास आणि आपुलकीची भावना पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा केवळ राखी पाठविण्याचा उपक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना रुजविणारा एक सुंदर उपक्रम आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये ‘देशासाठी आपणही काहीतरी करू शकतो’ या भावनेचा जागर करण्यात आला. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सैनिकांचे त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि देशरक्षणातील योगदान याविषयी माहिती दिली. सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असतात. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी स्वप्निल साखळे सर, कुलकर्णी मॅडम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण महाराज जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यालयातील विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रमाला भावनिक आणि देशभक्तीपूर्ण वातावरण लाभले. सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या मनगटावर ही राखी बांधली जाणार असली, तरी तिच्यातील प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीचा धागा संपूर्ण देशाला जोडणारा आहे. ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमातून अमृतने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याबरोबरच सैनिकांप्रती कृतज्ञतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment