बीड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय, बीड येथे अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
बीड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय, बीड येथे अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवशंभू विचार मंच, देवगिरी प्रांताचे संयोजक तथा इतिहास अभ्यासक श्री. गोरक्षनाथ आबूज यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या गौरवशाली पराक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. श्री. आबूज हे शासकीय माध्यमिक विद्यालय, थेटेगव्हाण, ता. धारूर, जि. बीड येथे अध्यापक असून महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज साहित्य साधने समिती तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम व पुस्तक निर्मिती महामंडळ (बालभारती), पुणेचे सदस्य आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. आबूज यांनी बाजीराव पेशव्यांच्या अद्वितीय युद्धकौशल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. माळवा, धार, पालखेड, बुंदेलखंड, दिल्ली आणि भोपाळ यांसारख्या मोहिमांचा संदर्भ देत त्यांनी बाजीरावांच्या वेगवान हालचाली, अचूक नियोजन आणि प्रभावी युद्धनीतीचे महत्त्व स्पष्ट केले.
पालखेडची लढाई ही आजही युद्धनीतीशास्त्रातील उत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासली जाते, असे सांगताना त्यांनी बाजीरावांच्या नेतृत्वगुणांचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने निर्णय घेणे, शत्रूच्या हालचालींचा अचूक अंदाज घेणे आणि वेगवान युद्धतंत्राच्या माध्यमातून विजय मिळवणे ही बाजीरावांच्या युद्धशैलीची वैशिष्ट्ये होती, असे त्यांनी सांगितले.
बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे महत्त्व सांगताना श्री. आबूज यांनी इतिहासातील विविध संदर्भांचाही उल्लेख केला. ड्यूक ऑफ वेलिंग्टनने नेपोलियनच्या युद्धातील प्रभावाचे केलेले वर्णन आणि इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी नोंदविलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या बाजीरावांवरील विश्वासाचा संदर्भ त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी आपल्या पराक्रमाने मोलाचे योगदान देणाऱ्या पेशव्यांचे कार्य आणि त्यांची स्वराज्यनिष्ठा कायम स्मरणात ठेवली पाहिजे. त्यांच्या पराक्रमातून आजच्या पिढीने शौर्य, धैर्य, नेतृत्व आणि दूरदृष्टीची प्रेरणा घ्यावी,” असे प्रतिपादन श्री. आबूज यांनी केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना इतिहासाकडे केवळ भूतकाळ म्हणून न पाहता, त्यातून प्रेरणा घेऊन वर्तमान आणि भविष्य घडविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विद्यासभा उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उमेश जगताप, पर्यवेक्षक हरिभाऊ साबळे आणि अमृत जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सविता कुलकर्णी यांनी केले, तर सूत्रसंचालन मुकुंद मिरगे यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृतच्या वतीने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची, युद्धनीतीची आणि नेतृत्वाची प्रेरणादायी ओळख करून देत त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४६८ अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment