अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी), महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्था आणि ज्ञानदा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली, धाराशिव येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच आरी वर्क प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी), महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्था आणि ज्ञानदा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली, धाराशिव येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच आरी वर्क प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला पुढे नेत, आपल्या धाडसी मोहिमा, अद्वितीय युद्धकौशल्य आणि दूरदृष्टीच्या बळावर मराठ्यांचे सामर्थ्य दख्खनच्या पलीकडे उत्तर हिंदुस्थानापर्यंत प्रस्थापित करणारे अपराजित योद्धे म्हणून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे कार्य इतिहासात अजरामर आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धाराशिवचे शहर कार्यवाहक श्री. विश्वासजी कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा व कार्याचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला.
अवघ्या वयाच्या २० व्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या आणि युद्धकौशल्याच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला व्यापक स्वरूप देत मराठ्यांचा भगवा उत्तर हिंदुस्थानापर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आरी वर्क प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. चिन्मय कुलकर्णी, उपव्यवस्थापक श्री. अजय कुलकर्णी, ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष- मा.श्री. शिवराज आचार्य, श्री. सौरभ देशमुख(राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,शहर शारीरिक प्रमुख), सौ. सगुणाताई आचार्य (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत आणि ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या कौशल्यविकास व प्रशिक्षण उपक्रमांमुळे महिलांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, अशा उपक्रमांना भविष्यातही प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment