महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत संवाद सेतू’ या अभिनव उपक्रमांतर्गत मेहकर एज्युकेशन सोसायटी तसेच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण संस्था, देऊळगाव माळी येथील इयत्ता ८ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय, मेहकर येथे भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून मेहकर येथे विद्यार्थ्यांचा प्रशासनाशी थेट संवाद!
मेहकर (जि. बुलढाणा) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत संवाद सेतू’ या अभिनव उपक्रमांतर्गत मेहकर एज्युकेशन सोसायटी तसेच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण संस्था, देऊळगाव माळी येथील इयत्ता ८ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय, मेहकर येथे भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
नागरिकांच्या मनातील प्रशासनाबाबतचा दुरावा कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये शासनव्यवस्था, प्रशासनाचे कार्य तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाविषयी ज्ञान व जागरूकता निर्माण करणे, हा ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयाच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध विभागांचे कामकाज, नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, विविध दाखले व प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया तसेच महसूल प्रशासनाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत उत्सुकतेने विविध प्रश्न विचारले. नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, दाखले व प्रमाणपत्रे, शासकीय योजना तसेच महसूल विभागाच्या कार्याबाबत विद्यार्थ्यांनी जिज्ञासेने प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून उपस्थित अधिकारीही प्रभावित झाले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी तहसीलदार नीलेश मडके साहेब, नायब तहसीलदार नितीन बोरकर साहेब, मतदान विभागाचे कावळे साहेब, संजय गांधी विभागाचे नालट साहेब तसेच पुरवठा विभागाचे बोरुडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रश्न विचारण्याची पद्धत पाहून तहसीलदार नीलेश मडके साहेब यांनी ‘अमृत संवाद सेतू’ या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासन हे केवळ शासकीय कार्यालयांपुरते मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा थेट संबंध असतो, हे विद्यार्थ्यांना या संवादातून समजावून सांगण्यात आले. प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला.
‘अमृत पराक्रम दिना’निमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धेची माहिती
या भेटीच्या निमित्ताने अमृतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत पराक्रम दिना’ अंतर्गत आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जिज्ञासा, वक्तृत्व कौशल्य, लेखन कौशल्य तसेच नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे अनावरण तहसीलदार नीलेश मडके साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम तसेच प्राचार्य अरुण फिस्के सर यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी निबंध व वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमात मेहकर एज्युकेशन सोसायटी तसेच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण संस्था, देऊळगाव माळी येथील इयत्ता ८ वी ते ११ वीचे एकूण ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत प्रा. संजय जमदाडे सर, प्रा. अनिता पाटील मॅडम आणि समिधा मिश्रा मॅडम, कैलास राऊत (पत्रकार) तसेच नंदकिशोर मगर (अमृत संस्था, Deo) उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेण्याची, अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी मिळाल्याने ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, संवादात्मक आणि अनुभवाधारित ठरला.
प्रशासन आणि समाज, विशेषतः युवा पिढीमधील संवाद अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३७
अमृत संस्थेविषयी:- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये कार्यरत असून, अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment