हिंगोली जिल्हा कार्यालयात श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी युवा उद्योजक नवल दुबे, वकील मनोज जोशी व ज्येष्ठ विधी तज्ज्ञ शिंदे साहेब यांच्या हस्ते बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हिंगोली : आपल्या शौर्य, पराक्रम आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर इतिहासात अजरामर ठरलेले थोर योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली येथील जिल्हा कार्यालयात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ब्राह्मण समाजाचे प्रतिष्ठित युवा उद्योजक नवल दुबे, ब्राह्मण समाजाचे वकील मनोज जोशी तसेच ज्येष्ठ विधी तज्ज्ञ शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अत्यंत कमी वयात त्यांनी आपल्या असामान्य युद्धकौशल्याच्या जोरावर अनेक लढायांमध्ये विजय मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे धाडसी नेतृत्व, वेगवान निर्णयक्षमता, युद्धनीती आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
श्रीमंत बाजीराव पेशवे हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याची जिद्द असलेले प्रभावी नेतृत्व होते. त्यांच्या कार्यातून युवकांनी धैर्य, नेतृत्वगुण, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यभावना आत्मसात करावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार करणे ही काळाची गरज असल्याचेही उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
या जयंती कार्यक्रमास विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, ब्राह्मण समाजातील मान्यवर, युवा उद्योजक तसेच नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन श्रीमंत बाजीराव पेशवे यांना अभिवादन केले. उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात कार्यक्रम पार पडला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment