स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ; स्टॉल बुकिंग सुरू
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि एस. के. ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे ‘रक्षाबंधन विशेष अमृत पेठ २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत गजानन महाराज मंदिर, धाबेकर नगर, खडकी, अकोला येथे ही बाजारपेठ भरविण्यात येणार आहे. या अमृत पेठेसाठी स्टॉल बुकिंग सुरू असून इच्छुक उद्योजकांना आपला स्टॉल नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देणे तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष अमृत पेठेत राख्या, कपडे, ज्वेलरी, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, गिफ्ट आयटम्स तसेच विविध महिला व लघुउद्योजकांनी तयार केलेली उत्पादने एकाच ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रक्षाबंधन तसेच सणासुदीच्या खरेदीसाठी अकोलेकरांना विविध वस्तूंची निवड करण्याची संधी मिळणार आहे. ‘अमृत पेठ ’ हा उपक्रम केवळ वस्तूंच्या विक्रीपुरता मर्यादित नसून नवउद्योजकांना ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची, आपल्या उत्पादनांची ओळख निर्माण करण्याची आणि व्यवसायवृद्धीसाठी नवीन संधी मिळविण्याची बाजारपेठ आहे. अमृत संस्थेमार्फत स्वयंरोजगार व उद्योजकता विकासासाठी विविध प्रशिक्षण व योजनांच्या माध्यमातून युवक-युवती आणि उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘अमृत पेठ’च्या माध्यमातून उद्योजकांच्या उत्पादनांना प्रत्यक्ष बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अकोला शहर व परिसरातील नागरिकांनी ‘रक्षाबंधन विशेष अमृत पेठ –२०२६’ला मोठ्या संख्येने भेट द्यावी, स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227636, 8262833277, 8669170780
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment