शालेय विद्यार्थ्यांनी दिली खानापूर तहसील कार्यालयाला भेट.
विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळख व्हावी आणि शासकीय कामकाज कसे चालते हे समजून घेता यावे, या उद्देशाने 'अमृत' या संस्थेच्या वतीने विटा येथे 'अमृत संवाद सेतू ' हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी खानापूर तहसील कार्यालयाला अभ्यासू भेट दिली. या वेळी खानापूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची पद्धत, विविध विभाग आणि शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. यासोबतच नायब तहसीलदार विजय साळुंखे यांनी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध कामांची माहिती दिली, तर नायब तहसीलदार अभिजित हजारे यांनी पुरवठा विभाग, भूमि अभिलेख कार्यालय आणि निवडणूक विभाग या अत्यंत महत्त्वाच्या विभागांची कार्यपद्धती व तेथील कामकाज कसे चालते, याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून सांगितले. 'अमृत'चे सांगली जिल्हा व्यवस्थापक मनोज मिरासदार यांनी या वेळी 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमाचे आयोजन करण्यामागची भूमिका मांडली. विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय कामकाजाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि भविष्यात नागरिकांना सेवा देणाऱ्या यंत्रणेची त्यांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी आणि शिक्षक वैभव मिरासदार सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल शिक्षक वैभव मिरासदार यांनी तहसीलदार व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७६६ / ७०५७६०७४१९/७९७२८३०७५७
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment