थोरल्या बाजीरावांचा पराक्रम विद्यार्थ्यांच्या मनात रुजवा! ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त इतिहास तज्ज्ञ जगन्नाथ लडकत यांचे प्रेरणादायी व्याख्यान
बाजीरावांचा पराक्रम विद्यार्थ्यांच्या मनात रुजवा! ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त इतिहास तज्ज्ञ जगन्नाथ लडकत यांचे प्रेरणादायी व्याख्यान जालना : वेगवान युद्धनीती, धाडसी निर्णयक्षमता आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर इतिहासात अजरामर ठरलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन इतिहास तज्ज्ञ व अभ्यासक मा. जगन्नाथ लडकत यांनी केले. बद्रिनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मा. जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याचा आणि पराक्रमाचा इतिहास रंजक पद्धतीने सांगितला. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धा तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. व्याख्यानात मा. जगन्नाथ लडकत यांनी बाजीराव पेशव्यांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग विद्यार्थ्यांसमोर उलगडले. त्यांच्या धाडसी युद्धनीतीमुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे मिळालेल्या विजयांची माहिती देताना विशेषतः पालखेडच्या ऐतिहासिक युद्धातील नियोजन, युद्धनीती आणि पराक्रम यावर त्यांनी प्रकाश टाकला. इतिहास हा केवळ पुस्तकात वाचण्यासाठी नसतो, तर इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी असतो. विद्यार्थ्यांनी थोरले बाजीराव पेशव्यांच्या जीवनातून ध्येय, शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मा. लडकत यांनी केले. ‘अमृत पराक्रम दिना’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थोरले बाजीराव पेशव्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती देण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)चे राज्य व्यवस्थापक श्री. दीपक जोशी, जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३०२८३०५८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment