अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) ला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. अमृत कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवक-युवतींमध्ये उद्योजकतेची सकारात्मक मानसिकता विकसित करून त्यांना स्वयंरोजगार व उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विभागीय व जिल्हा कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) ला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.
अमृत कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर संतोष जुवळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट करताना अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘उद्योजकीय माईंडसेट’ या विषयावर अमित सामंत यांनी मार्गदर्शन केले. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, जोखीम स्वीकारण्याची तयारी, संधी ओळखण्याची क्षमता, नियोजन आणि सातत्य यांचे महत्त्व त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
त्यानंतर ‘व्यवसाय टॅक्सेशन व व्यावसायिक आर्थिक साक्षरता’ या विषयावर टॅक्स कन्सल्टंट प्रदीप पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. व्यवसायातील करप्रणाली, आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन, उत्पन्न-खर्चाचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि व्यवसायाच्या आर्थिक नोंदी याबाबत त्यांनी प्रशिक्षणार्थींना सविस्तर माहिती दिली.
प्रशिक्षणामध्ये उद्योजकतेशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विविध शासकीय योजना व सुविधा, व्यवसायासाठी उपलब्ध कर्ज योजना, अर्थसहाय्याच्या संधी, प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया तसेच अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे.
याशिवाय यशस्वी उद्योजकांचे अनुभव व प्रत्यक्ष व्यवसायातील अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे. ‘नोकरी शोधणाऱ्यापेक्षा रोजगार निर्माण करणारा उद्योजक घडविणे’ या व्यापक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणातून युवक-युवतींना व्यवसायाच्या संधी ओळखणे, योग्य नियोजन करणे, उपलब्ध शासकीय सुविधा व अर्थसहाय्याचा लाभ घेणे आणि व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. उद्योजकतेला चालना देणाऱ्या या उपक्रमास प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंरोजगार, रोजगारनिर्मिती, आर्थिक स्वावलंबन आणि नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी EDP प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - 80872 76515
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment