हिंगोली येथे EDP प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी बँकिंग, CIBIL व कर्ज प्रक्रिया तर तिसऱ्या दिवशी यशस्वी उद्योजकतेसाठी मार्गदर्शन
हिंगोली : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने रेनबो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, हिंगोली येथे सुरू असलेल्या अमृत उद्योग कौशल्यवर्धन (Entrepreneurship Development Program – EDP) प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी लाभार्थ्यांना बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षक श्री. अंकुश देशमाने सर यांनी बँकिंग व्यवहार, CIBIL स्कोअरचे महत्त्व, विविध प्रकारची कर्जे, कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे, बँकेचे नियम व अटी, उद्योगासाठी कर्ज प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया तसेच आर्थिक नियोजनाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच उद्योग सुरू करताना आवश्यक असलेली कागदपत्रे, व्यवसाय आराखड्याचे महत्त्व, वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास CIBIL स्कोअर कसा सुधारतो आणि त्याचा भविष्यातील कर्ज मंजुरीवर होणारा सकारात्मक परिणाम याबाबतही त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांनी बँक कर्ज, आर्थिक व्यवस्थापन, सरकारी योजनांअंतर्गत उपलब्ध वित्तीय सहाय्य आणि उद्योगासाठी निधी उभारणी यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. श्री. देशमाने यांनी सर्व प्रश्नांचे सविस्तर निरसन करून उद्योजकांनी आर्थिक शिस्त व योग्य नियोजनाचे महत्त्व समजावून सांगितले.
या प्रशिक्षणामुळे लाभार्थ्यांना बँकिंग व्यवहार, कर्ज प्रक्रिया, CIBIL स्कोअरचे महत्त्व आणि उद्योगासाठी आवश्यक आर्थिक नियोजन याविषयी उपयुक्त माहिती मिळाली. प्रशिक्षणास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशिक्षक श्री. बागंर सर यांनी लाभार्थ्यांना यशस्वी उद्योजकतेसाठी आवश्यक विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी यशस्वी उद्योगांचे अनुभव, व्यवसायाची सुरुवात कशी करावी, आर्थिक नियोजनाचे महत्त्व, मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या पद्धती तसेच उद्योगाची शाश्वत वाढ साधण्यासाठी आवश्यक व्यवस्थापन कौशल्ये याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी, बाजारपेठेचे नियोजन, खर्च नियंत्रण आणि योग्य निर्णयक्षमतेचे महत्त्व स्पष्ट केले. उपस्थित लाभार्थ्यांनी उद्योग, व्यवसाय नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनासंदर्भात विविध प्रश्न विचारले. श्री. बागंर सर यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन लाभार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.
या मार्गदर्शनामुळे लाभार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान, नियोजन कौशल्ये आणि आत्मविश्वास मिळाला. प्रशिक्षणास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment