जालना येथे अमृतच्या १० दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच उत्साहात उद्घाटन झाले
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील अशा जातींतील, ज्यांच्यासाठी शासनाचा स्वतंत्र विभाग, संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी १० दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हा प्रशिक्षण कार्यक्रम ३० जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला असून, विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओमकार शेटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना स्थानिक संसाधने, उपलब्धता आणि बाजारपेठेच्या गरजांचा अभ्यास करून व्यवसायाची निवड करण्याचे आवाहन केले. स्थानिक पातळीवर उपलब्ध संधींचा प्रभावी उपयोग करून स्वावलंबी आणि यशस्वी उद्योजक घडावेत, असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. शरद जोशी यांनी "व्यवसायाची निवड व व्यवसायिकाची मानसिकता" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. व्यवसाय सुरू करताना आवश्यक असलेली सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास, योग्य नियोजन, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक गुण याविषयी त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा टीम आयोजक म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी युवक-युवतींचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या १० दिवसीय प्रशिक्षणामध्ये उद्योग उभारणी, शासनाच्या विविध योजना, व्यवसाय नोंदणी, आर्थिक नियोजन, विपणन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, व्यवसाय व्यवस्थापन आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून, सहभागी युवक-युवतींना स्वावलंबी उद्योजक बनविण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे
अधिक माहितीसाठी संपर्क- 91302 83058
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment