महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाची दिमाखदार सुरुवात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाची दिमाखदार सुरुवात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली. या निमित्ताने पराक्रम दिनाचे अधिकृत पोस्टर माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, बिहारचे माजी कॅबिनेट मंत्री आणि पाच वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले मा. श्री. अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. स्वराज्य अभियानाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीला अभिवादन करण्यासाठी रत्नागिरी येथे आलेल्या मा. चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. अश्विनीकुमार चौबे यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करताना सांगितले की, भारतीय इतिहासात बाजीराव पेशवे हे अद्वितीय नेतृत्व, असामान्य युद्धनीती आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी एकही युद्ध न हरता मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापर्यंत केला. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, नेतृत्वगुण आणि कर्तव्यनिष्ठा यांची प्रेरणा युवकांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री. ओंकार फडके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष डॉ. हृषीकेश केळकर, श्री. समीर करमरकर, विविध लक्षित गटांचे पदाधिकारी, नगरसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत, इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी 'अमृत'ने हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
'अमृत'च्या वतीने १८ ऑगस्टपर्यंत राज्यभर विविध स्पर्धा, व्याख्यानमाला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, सोशल मीडिया जनजागृती अभियान तसेच युवकांसाठी विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धांची आणि उपक्रमांची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
'पराक्रम दिन' हा केवळ ऐतिहासिक स्मरणाचा दिवस नसून, समाजात राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, पराक्रम आणि नेतृत्वाची प्रेरणा जागविणारा लोकचळवळीचा उपक्रम ठरावा, हा 'अमृत'चा प्रयत्न आहे. इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देत त्यांच्यामध्ये राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या पोस्टर अनावरण सोहळ्यामुळे 'अमृत'च्या राज्यव्यापी पराक्रम दिन अभियानाचा औपचारिक शुभारंभ झाला असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रभर विविध उपक्रमांद्वारे अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment