महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात सुरू असलेल्या अमृत EDP कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी "जाहिरात" या विषयावर अनुभवी उद्योगतज्ज्ञ गौरवकुमार रमाकांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या अमृत उद्यम कौशल्य वर्धन (EDP) कार्यक्रमाचा दुसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दुसऱ्या दिवशी "जाहिरात" या महत्त्वाच्या विषयावर श्री. गौरवकुमार रमाकांत कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या संपूर्ण सत्राच्या यशस्वी आयोजनासाठी अमृतच्या जिल्हा टीमने पूर्ण सहकार्य केले.
गौरवकुमार कुलकर्णी यांनी शासकीय तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, सन २००७ पासून ऑईल अँड गॅस उद्योगात विविध पदांवर काम करत आहेत. कामानिमित्त त्यांना अनेक देशांमध्ये काम करण्याचा आणि वास्तव्यास राहण्याचा अनुभव आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांचा हा मोठा अनुभव त्यांनी प्रशिक्षणार्थींशी अतिशय सोप्या आणि समजेल अशा भाषेत शेअर केला.
व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात हीच सर्वात प्रभावी ताकद आहे, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात फक्त चांगले उत्पादन तयार करून उपयोग होत नाही, तर त्याची योग्य पद्धतीने प्रसिद्धी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वर्तमानपत्र, सोशल मीडिया, व्हाटस अप , फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, बॅनर, पोस्टर, डिजिटल मार्केटिंग तसेच ग्राहकांच्या अनुभवातून होणारी प्रसिद्धी अशा विविध जाहिरातीच्या माध्यमांची माहिती त्यांनी दिली. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यवसाय कसा पोहोचवायचा, ग्राहकांचा विश्वास कसा जिंकायचा, ब्रँडची ओळख कशी तयार करायची आणि योग्य नियोजन करून जाहिरात केल्यास विक्रीत कशी वाढ होते, याची त्यांनी अनेक प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली.
या मार्गदर्शन सत्राला प्रशिक्षणार्थींनी चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी आपल्या व्यवसायासंदर्भातील प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. जाहिरातीबाबत मिळालेल्या मार्गदर्शनाचा आपल्या व्यवसायात निश्चितच उपयोग होईल, अशी भावना सहभागी प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment