अमृतमार्फत उद्योजकता विकास कार्यक्रमास (EDP) उत्साहात प्रारंभ; व्यवसाय कल्पना व उद्योग उभारणीबाबत सखोल मार्गदर्शन
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या "उद्योजकता विकास कार्यक्रमास (EDP) दिनांक २० जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश स्वयंरोजगाराला चालना देणे तसेच नव्या व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करणे हा आहे. जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन श्री.कर्ण गुळवणी व श्री .प्रशांत जोशी यांनी केले तसेच श्री .संतोष जाधव यांनी नवउद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांचाशी संवाद साधला .
अमृत संस्था राज्यातील युवकांना कौशल्यविकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकता प्रोत्साहनासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सहभागी उमेदवारांना उद्योजकता म्हणजे काय, यशस्वी उद्योजकाचे गुण, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, व्यवसायातील संधी व आव्हाने याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उद्योग सुरू करण्यापूर्वी योग्य व्यवसायाची निवड, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा ओळखणे, स्पर्धात्मक वातावरणाचे विश्लेषण आणि व्यवसायातील जोखीम व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
व्यवसाय कल्पना कशी शोधावी ?स्थानिक गरजांवर आधारित उद्योग कसा उभारावा? नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप कसे द्यावे? आणि कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या उद्योगांची माहिती देण्यात आली. तसेच कृषीपूरक उद्योग, सेवा उद्योग, उत्पादन उद्योग, डिजिटल व्यवसाय, ऑनलाइन मार्केटिंग, महिला उद्योजकता आणि ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उभारणीचे विविध पर्याय, बँक कर्ज, शासकीय अनुदान योजना, उद्योग नोंदणी, आवश्यक परवाने, करप्रणाली, आर्थिक नियोजन तसेच व्यवसायाचे प्रभावी व्यवस्थापन या विषयांवरही माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणामध्ये सहभागी उमेदवारांना संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नोत्तर सत्र, प्रत्यक्ष उदाहरणे, यशस्वी उद्योजकांच्या अनुभवांच्या माध्यमातून व्यवसायातील संधी आणि अडचणी समजावून सांगण्यात आल्या. सहभागी युवकांनीही विविध व्यवसाय कल्पना मांडत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
अमृतमार्फत राबविण्यात येणारा हा उद्योजकता विकास कार्यक्रम युवकांना रोजगार शोधणाऱ्यांऐवजी "रोजगारनिर्माते बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल"ठरत असून, राज्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले तसेच अमृत जिल्हा व्यवस्थापक कोल्हापूर श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी उपस्थितांना व प्रशिक्षकांचे त्यांच्या उपस्थितीसाठी मनापासून आभार मानले . सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अमृत मित्र श्री. शिरीष कुलकर्णी व अमृत सखी सिद्धी गुर्जर सुद्धा उपस्थित होते . अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment