दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची संकल्पना निवड, व्यवसाय आराखडा (Business Plan), बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक नियोजन, भांडवल उभारणी, उद्योग नोंदणी, विविध शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, ग्राहक व्यवस्थापन तसेच उद्योग वृद्धीची प्रभावी तंत्रे यावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात झाला. अमृतचे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना मा.श्री. विजय जोशी यांनी, "आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरीच्या संधींबरोबरच उद्योजकतेच्या नव्या वाटा स्वीकारणे ही काळाची गरज आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न, नाविन्यपूर्ण कल्पना आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर यामुळे यशस्वी उद्योग उभारणे शक्य आहे,"असे प्रतिपादन केले. त्यांनी युवक-युवती, महिला, बचत गट तसेच नवउद्योजकांनी उपलब्ध प्रशिक्षण आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.
या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची संकल्पना, व्यवसाय आराखडा (Business Plan), आर्थिक नियोजन, भांडवल उभारणी, उद्योग नोंदणी, शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, ग्राहक व्यवस्थापन तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक विविध बाबींवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी, त्यांवरील उपाय आणि व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक कौशल्ये यांचीही माहिती दिली जाणार आहे.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला, बचत गटांचे सदस्य, स्टार्टअप उद्योजक तसेच लघु व मध्यम उद्योजक उपस्थित होते. उद्घाटन सत्रात प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. अमृत संस्थेच्या वतीने आयोजित हे प्रशिक्षण राज्यातील नवउद्योजकांना सक्षम बनविणे, स्वयंरोजगाराला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आले असून, या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योग उभारणीसाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment