महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्था व जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अमृत संवाद सेतु’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्था व जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे ‘अमृत संवाद सेतु’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची कार्यपद्धती, पत्रव्यवहार प्रक्रिया, संबंधित कायदे, शासन निर्णय (GR), तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपत्ति व्यवस्थापन विभागामार्फत मा. जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी यांनी अधिनियम, 2005, आपत्ति पूर्व तयारी, आपत्ति नंतरची कार्यवाही, पंचनामा प्रक्रिया, विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच आपत्ति निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सखोल माहिती दिली. संवैधानिक अधिकाराप्रमाणे प्रत्येक सामान्य नागरिकास कोणावरही अन्याय न होता योग्य वेळेस मदत मिळावी असे विधान केले. महसूल विभागाच्या सत्रामध्ये सातबारा, शासकीय जमीन, अतिक्रमण,नझुल जमीन, अनुकंपा प्रकरणे, ग्रामसभा, तसेच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (SDO) आणि जिल्हाधिकारी यांच्या अधिकार व जबाबदाऱ्या यांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महसूल विषयक अर्जांची प्रक्रिया, पात्रता-अपात्रता निकष आणि संबंधित कायदेशीर तरतुदी यांचीही माहिती देण्यात आली. गृह शाखेच्या मार्गदर्शनामध्ये कायदा व सुव्यवस्था, मोर्चे , उपोषणे व आंदोलने, हेलिकॉप्टर व ड्रोन उड्डाणासाठी तसेच बंदूक, बारूद शस्त्र वापरण्यासाठी आवश्यक परवानग्या, ज्येष्ठ माता पिता निर्वाह भत्ता, तसेच विविध विभागांमधील समन्वयाची प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तलाठी आस्थापना विभागामार्फत सेवा विषयक बाबी,तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांच्या जबाबदाऱ्या आणि प्रशासनातील त्यांच्या भूमिका, भरती प्रक्रिया, पदोन्नती बाबत माहिती देण्यात आली. तसेच आवक जावक विभागामार्फत पत्रव्यवहार व प्रक्रिया , आवक-जावक, घोषवारा, पत्रांची नोंद, पत्रव्यवहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ई-ऑफिस प्रणालीद्वारे होणारे डिजिटल कार्यालयीन कामकाज, ऑनलाइन पत्रव्यवहार, तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध विविध योजना, शासन निर्णय (GR) आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती कशी मिळवावी याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयीन व स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सहभागी होते. सहभागीांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे कार्य, प्रशासकीय प्रक्रिया, कायदेशीर बाबी आणि नागरिकांसाठी उपलब्ध सेवांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने ‘अमृत संवाद सेतु’ हा उपक्रम ज्ञानवर्धक व अत्यंत उपयुक्त ठरला. श्री. सावन कुमार (मा. जिल्हाधिकारी) यांच्या नेतृत्वात, श्रीमती. लीना फलके (मा. निवासी उप जिल्हाधिकारी), श्रीमती. रोहिणी पाठराबे अधिक्षक (तहसीलदार) यांच्या सहकार्याने व श्रीमती. वैशाली सावरबांधे (सहाय्यक अधिक्षक) यांच्या उपस्थितीत हे उपक्रम पार पडले. अमृत संस्थेच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच उपक्रम सकारात्मकरित्या राबविल्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे सहर्ष आभार मानले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment