देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अमृत स्वायत्त संस्थेच्या वतीने विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी व उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्वावलंबनाच्या संधींची सविस्तर माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या ६५ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका ॲड. सौ. माधुरीताई अदवंत होत्या. विशेष अतिथी म्हणून अमृत स्वायत्त संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओंकार शेटे, एमओसीचे मार्केटिंग प्रमुख श्री. देविदास बासरकर, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक श्री. योगेश रोडे उपस्थित होते.
यावेळी श्री. ओंकार शेटे यांनी अमृत संस्थेमार्फत विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती दिली. तसेच अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजनांद्वारे मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र जेहुरकर, महिला अध्यक्षा श्रीमती मोनिका शंतनु चौधरी, उपाध्यक्ष श्री. श्रीपाद मुगुटे, सचिव श्री. नरेश पटवर्धन, कोषाध्यक्ष श्री. अंबादास कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीना कुलकर्णी डोणगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अंबादास कुलकर्णी यांनी केले. पालक, विद्यार्थी आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सत्कार सोहळा यशस्वी ठरला. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment