सिल्लोड येथे ‘अमृत कुटुंब संवाद’ उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे.
सिल्लोड येथे ‘अमृत कुटुंब संवाद’ उपक्रमाचा शुभारंभ
सिल्लोड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या वतीने कुटुंबातील संवाद वाढवणे, संस्कार व कौटुंबिक मूल्ये जपणे या उद्देशाने ‘अमृत कुटुंब संवाद – संवाद आणि सुदृढ कुटुंबासाठी एक पाऊल’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ २५ जून रोजी सिल्लोड येथील वे.द.शा. स. सदाशिव शास्त्री जोशी मंगरुळकर यांच्या निवासस्थानी करण्यात आला. हा उपक्रम अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून, राज्य प्रमुख दीपक जोशी तसेच मराठवाडा विभाग प्रमुख अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी सिल्लोड येथून या उपक्रमाची सुरुवात केली.
‘अमृत कुटुंब संवाद’ अंतर्गत आजी-आजोबा संवाद कट्टा, एकत्र कुटुंब प्रार्थना, कुटुंब वाचन संस्कृती अभियान, मातृ-पितृ वंदन दिवस, कुटुंबीय खेळ व आनंद मेळावा, भारतीय सण-परंपरा परिचय, कुटुंब आरोग्य व योग सत्र, एक दिवस मोबाईल मुक्त कुटुंब, कुटुंब सेवा अभियान तसेच कुटुंब कौशल्य विकास कार्यशाळा यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी श्री. सदाशिव शास्त्री जोशी मंगरुळकर यांनी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. कुटुंबव्यवस्था मजबूत करण्यासाठी, भारतीय संस्कार जपण्यासाठी आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी अमृतच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
कुटुंबात संवाद वाढवणे, भारतीय संस्कार व मूल्ये जपणे, पिढ्यांमधील नाते दृढ करणे आणि सुसंस्कृत, सुदृढ व आनंदी कुटुंब घडवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
“सुसंस्कृत कुटुंब – समृद्ध समाज – सक्षम राष्ट्र”
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment