अमृत परिवार सर्वेक्षणातील नंदुरबार जिल्ह्यातील काही नोंदी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील काही अनुभव...
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील बामखेडा या गावात ब्राह्मण समाजातील श्री. पुराणिक यांच्या घरी जाऊन परिवार सर्वेक्षणाची माहिती दिली. ३२ वर्षांचा दिव्यांग मुलगा आणि आई-वडील असा आपला परिवार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपली समस्या सांगितली. त्यांनी तीन वर्षांपूर्वी 'सीएमईजीपी'च्या माध्यमातून चक्की घेण्यासाठी कर्जाकरिता अर्ज केला. परंतु मुलगा दिव्यांग, वडील शेतकरी आणि शेतावर कर्ज आहे, असे कारण देऊन बँकेने कर्ज देण्यासाठी नकार दिला. दिव्यांग मुलगा ३२ वर्षांचा झाला, तरी आतापर्यंत पेन्शन मिळालेले नाही. तसेच, दिव्यांग असल्याने २५ किलो जास्त रेशन मिळते, तेही आतापर्यंत मिळालेले नाही. या दाम्पत्याला एक दिव्यांग मुलगीही होती. ती काही दिवसांपूर्वी निवर्तली, असे त्यांनी सांगितले.
मी लगेच जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांच्याशी त्यांचा फोनवरून संपर्क साधून दिला. अमृत संस्थेच्या माध्यमातून शक्य तितकी मदत करून प्रलंबित कामे पूर्ण करू, असा शब्द मीदेखील दिला. त्यांनी मला भोजनासाठी आग्रह केला; पण माझे भोजन झालेले असल्या मुळे मी त्यांना नकार दिला. सौ. पुराणिक यांनी मला सरबत करून दिले व आशीर्वादही दिले.
काही गावांत प्रवास करत असताना नवीन ऐतिहासिक पर्यटनस्थळे दिसून आली. काही ठिकाणी सर्वेक्षणानंतर भोजनासाठी आग्रह केला गेला आणि काही ठिकाणी पाणीसुद्धा विचारले गेले नाही, असे अनुभवदेखील आले. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या समस्या पाहता आल्या. खूप जणांना संस्थेची माहिती नव्हती. त्यामुळे माहिती दिल्यावर अनेकांनी संस्थेचे अभार मानले.
कार्तिक जीवनसिंह तोमर,
नंदुरबार जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment