अमृत परिवार सर्वेक्षणातील नंदुरबार जिल्ह्यातील सुखद अनुभव
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील हृद्य अनुभव...
नंदुरबार जिल्ह्यात भामेर, टीसी, नगाव अशा तीन गावांचे मिळून एक संघ गाव आहे. त्या गावात मी परिवार सर्वेक्षणासाठी गेलो होतो. दुपारचे दोन वाजले होते. टळटळीत ऊन होते. टीसी गावात ब्राह्मण समाजाचे एकच घर होते आणि ते थोडे दूर, गावाच्या पलीकडे होते. तरीही पत्ता विचारत विचारत मी गेलो. तिथे कुलकर्णी आजोबा-आजी झोपले होते. अमृत संस्था या समाजासाठी काम करते असे सांगितले. त्यांना सविस्तर माहिती दिली आणि त्यांचे सर्वेक्षण करून घेतले. अशी संस्था आहे हे कळल्यावर त्यांना खूप चांगले वाटले. त्यांनी पाणी तर दिलेच; पण चहाही विचारला. उन्हामुळे चहा नको सांगितला, की त्यांनी मला आपुलकीने संध्याकाळी किंवा सकाळी लवकर फिरण्याचा सल्ला दिला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी मला सरबत पिण्यासाठी ५० रुपये दिले. मी नाकारले. तरीही ते प्रेमाने म्हणाले, की 'तुम्ही करत असलेले काम चांगले आहे. आजपर्यंत कोणी आमच्या घरी आले नव्हते. तुम्ही उन्हातून आलात, म्हणून आम्हाला चांगले वाटण्यासाठी हे पैसे घ्या आणि सरबत प्या.' शेवटी त्यांनी प्रेमाने दिलेले ते पैसे घेतले आणि गावाच्या बाजारात येऊन सरबत घेतले. त्या सरबताला आपुलकीची गोडी जाणवत होती.
पुढे प्रमोद रोडे यांची भेट घेतली. त्यांचा घरी मस्त शांत आणि थंड वाटत होते. सर्वेक्षणानंतर त्यांनी आग्रहाने घरचे जेवण जेवू घातले. मी स्वर्गात जाऊन राजेशाही जेवण जेवतोय, असे मला वाटत होते. परिवार सर्वेक्षणातील हे अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहेत.
योगेश अहिरे,
जिल्हा व्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment