मुंबईतील अमृत परिवार सर्वेक्षणावेळी नोंदवलेली काही निरीक्षणे
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. मुंबईतील सर्वेक्षणावेळी आलेले अनुभव....
मुंबईत अमृत परिवार सर्वेक्षण करताना असे आढळले, की अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील गावाकडून शहराकडे स्थलांतरित झालेला एक वर्ग आता तिथून परदेशात कधी स्थलांतरित झाला हे कोणाला कळलेच नाही. या वर्गातील बरीच तरुण पिढी परदेशात स्थायिक झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांचे फक्त वयोवृद्ध आई-वडील राहतात. ती मंडळी याच गोष्टीची वाट बघत आहेत, की सुट्ट्यांमध्ये किंवा चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब लागल्यास आपला मुलगा/मुलगी मुंबईत परत येईल. याउलट, त्या मुलांना असे वाटू लागले आहे, की 'परदेशात स्थायिक झालो आहोत, तर आई-बाबांनासुद्धा येथेच बोलावून घेईन. काय राहिले आहे सध्या मुंबईत...' अशा मनःस्थितीमध्ये हा एक वर्ग जगत आहे.
काही वयोवृद्धांनी ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्याविषयी चौकशी केली. त्या तालुक्यातील अमृतमित्रांच्या माध्यमातून त्यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देण्याचे ठरवले आहे.
दुसरे निरीक्षण असे आहे, की या ठिकाणी भिक्षुकी करणारा वर्ग हळूहळू कमी होत चालला आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सध्या इतर शहरांतून गुरुजी येऊन तो कार्यक्रम करून निघून जातात. म्हणून ही संस्कृती टिकवण्यासाठी मुंबईमध्ये एखादे चांगले गुरुकुल सुरू करता येईल का, मुंबईतील गिरगाव-माटुंगा येथील गुरुकुलांविषयी, तसेच संस्थेचा प्रचार-प्रसार वाढू शकेल का, असे काही जणांनी सुचवले आहे.
राजेश पवार
मुंबई जिल्हा व्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment