अमृतच्या EDP प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी उद्योगतज्ज्ञ गौरवकुमार रमाकांत कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना जाहिरातीचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, बॅनर, पोस्टर आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून कमी खर्चात व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवायचा, याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. “उत्पादन चांगलं असणं महत्त्वाचं, पण ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं त्याहून महत्त्वाचं,” आहे
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या अमृत उद्यम कौशल्य वर्धन (EDP) कार्यक्रमाचा दुसरा दिवस उत्साहात पार पडला. या दिवशी प्रशिक्षणार्थींना व्यवसायासाठी जाहिरात किती महत्त्वाची आहे, याबद्दल उद्योग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ गौरवकुमार रमाकांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी गौरवकुमार कुलकर्णी यांचे स्वागत केले. यावेळी अमृतच्या जिल्हा टीमने प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी पूर्ण सहकार्य केले. गौरवकुमार कुलकर्णी यांनी शासकीय तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून, सन २००७ पासून ते ऑईल अँड गॅस उद्योगात वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत. कामानिमित्त त्यांना अनेक देशांमध्ये काम करण्याचा आणि राहण्याचा अनुभव मिळाला आहे. उद्योग क्षेत्रातील या अनुभवाचा फायदा त्यांनी प्रशिक्षणार्थींना अगदी सोप्या आणि रोजच्या वापरातल्या भाषेत समजावून सांगितला.
“व्यवसाय सुरू केला, उत्पादन चांगलं आहे; पण लोकांना त्याची माहितीच नाही, तर ग्राहक येणार कसा?” या मुद्द्यावर त्यांनी जाहिरातीचे महत्त्व समजावून सांगितले. आजच्या काळात फक्त चांगलं उत्पादन किंवा सेवा देऊन चालत नाही, तर ती योग्य लोकांपर्यंत पोहोचवणंही तितकंच गरजेचं आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी वर्तमानपत्र, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, बॅनर, पोस्टर आणि डिजिटल मार्केटिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसायाची जाहिरात कशी करता येते, याबद्दल माहिती दिली. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यवसायाची माहिती कशी पोहोचवायची, ग्राहकांचा विश्वास कसा वाढवायचा, आपल्या व्यवसायाची वेगळी ओळख कशी तयार करायची आणि जाहिरातीचं योग्य नियोजन केल्यावर विक्रीमध्ये कशी वाढ होऊ शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांमधून समजावून सांगितले.
ग्राहकांनी आपल्या व्यवसायाबद्दल चांगलं सांगणं हीसुद्धा मोठी जाहिरात आहे, असे सांगत त्यांनी ग्राहकांचा अनुभव आणि तोंडी प्रसिद्धीचे महत्त्वही प्रशिक्षणार्थींना समजावून सांगितले. तसेच पीपीटीच्या माध्यमातून जाहिरातीचे प्रकार, त्यांचा वापर आणि व्यवसाय वाढवण्यासाठी जाहिरात कशी करावी, याबद्दल प्रशिक्षणार्थींना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना आपल्या व्यवसायाची जाहिरात करताना नेमकं काय करायचं आणि कुठल्या माध्यमाचा वापर करायचा, याची चांगली माहिती मिळाली.
या मार्गदर्शन सत्राला प्रशिक्षणार्थींनी चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी आपल्या व्यवसायासंदर्भातील प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. जाहिरातीबाबत मिळालेल्या मार्गदर्शनाचा आपल्या व्यवसायात निश्चितच उपयोग होईल, अशी भावना सहभागी प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संपर्क : 7391065475 / 9403200606 संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment