महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसील कार्यालयात आयोजित ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शासकीय कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत योजनांची माहिती घेतली. आत्मविश्वास, प्रशासनाविषयी विश्वास आणि शासनाशी संवादाची नवी दिशा देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
आर्वी (जि. वर्धा) :महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांचे कार्य प्रत्यक्ष समजावे, शासकीय कार्यालयांबाबतची भीती दूर व्हावी तसेच शासनाच्या योजनांची अचूक माहिती मिळावी या उद्देशाने 'अमृत संवाद सेतू' उपक्रमाचे आयोजन आर्वी तहसील कार्यालयात करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धीरज राठी, जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत, वर्धा यांनी केले. त्यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. यानंतर ऋषिकेश जी खराटे, जिल्हा व्यवस्थापक, अमृत, वर्धा यांनी अमृतच्या विविध योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, संजय गांधी योजना शाखा, सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशनिंग) शाखा, सेतू सुविधा केंद्र, निवडणूक शाखा, नायब तहसीलदार कार्यालय तसेच उपकोषागार (ट्रेझरी) कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक विभागाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, निवासी उपविभागीय अधिकारी उमेश चव्हाण, तहसीलदार हरीश काळे, नायब तहसीलदार सुजाता उईके तसेच उपकोषागार अधिकारी सुरेंद्र विश्वराव पवाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विभागांचे कार्य, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा आणि प्रशासनाची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः तहसीलदार हरीश काळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत महसूल प्रशासनाची कार्यपद्धती अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली. यावेळी अनंता जी झाडे , खादी ग्राम विदर्भ प्रमुख व अमृत मित्र यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी गांधी विद्यालयाच्या शिक्षकांनी अमृत संस्थेचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आणि शासकीय यंत्रणेविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणारे असे उपक्रम नियमितपणे व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमातील सर्वात प्रेरणादायी क्षण म्हणजे, यापूर्वी सार्वजनिकरीत्या बोलण्यास संकोच करणाऱ्या आणि अडखळत बोलणाऱ्या एका विद्यार्थ्याने सर्वांसमोर आत्मविश्वासाने आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धीरज राठी, जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत, वर्धा यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवर अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रशासनाशी प्रत्यक्ष जोडणारा, शासनाच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा 'अमृत संवाद सेतू' उपक्रम आर्वीत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment