या संवादाद्वारे विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली गेली.
सिल्लोडमध्ये ‘अमृत युवा शासन संवाद’ उपक्रमाचा शुभारंभ;
विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची प्रत्यक्ष माहिती
सिल्लोड, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयात ‘अमृत युवा शासन संवाद’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रथमच या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. या अंतर्गत सिल्लोड तहसील कार्यालयातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, मराठवाडा विभाग व्यवस्थापक अमित सामंत आणि विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अंकिता ताकभाते होत्या. त्यांनी अमृतच्या या उपक्रमाचे कौतुक करत, शासन आणि युवक यांच्यात थेट संवाद निर्माण करणारा हा अतिशय उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगितले.
यावेळी तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शासकीय योजना, त्यांचे लाभ, तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. विविध प्रमाणपत्रे व शासकीय कागदपत्रे कशी तयार केली जातात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थ्यांनी ही त्यांची तहसील कार्यालयातील पहिलीच भेट असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेले मार्गदर्शन समजण्यास सोपे व उपयुक्त असल्याचे सांगत, भविष्यात स्वतःची कागदपत्रे तयार करताना आणि गावातील नागरिकांना मार्गदर्शन करताना या माहितीचा निश्चितच उपयोग होईल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, राज कॉम्प्युटरच्या संचालिका जयश्री कुलकर्णी, सहाय्यक महसूल अधिकारी अशोक दराडे, पुरवठा विभागाचे बळीराम मुंडे, संजय गांधी योजना विभागाचे अशोक मोरे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment