२५ मे ते २ जून या कालावधीत घ्या काळजी
येत्या २५ मेपासून दोन जून २०२६पर्यंतच्या नऊ दिवसांमध्ये नवतपा असेल. हिंदू पंचांगानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्या काळाला नवतपा म्हणतात. हा अतिउष्णतेचा नऊ दिवसांचा काळ असतो. हा कालावधी संपूर्ण भारतात मेच्या अखेरीस-जूनच्या सुरुवातीला अनुभवला जातो. या नऊ दिवसांत विदर्भात तर तीव्र उन्हाळा आणि उष्णतेची लाट जाणवते.
मे महिन्याच्या अखेरीस विदर्भातील तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. विदर्भातील नवतपा आणि उन्हाळ्याच्या तीव्रतेविषयी महत्त्वाची माहिती अशी -
नागपूर, अकोला, अमरावती चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांत पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊन विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद होते. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांतही कमाल तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहते. उष्णतेची तीव्र लाट असल्यामुळे दुपारी रस्ते ओस पडतात आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होतात.
हवामान विभागाकडून विदर्भासाठी येलो किंवा ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात न जाण्याचा आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
उन्हामुळे माणसाला विविध त्रास होऊ शकतात. उदाहरणार्थ, उष्माघात होऊ शकतो. त्यामध्ये शरीराचे तापमान अनियंत्रित वाढते. डीहायड्रेशन होऊ शकते. कारण शरीरातील पाणी कमी होते. तसेच, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, त्वचेवर उन्हामुळे होणारे चट्टे किंवा जळजळ, अशा अनेक समस्यांचा समावेश होतो. प्राण्यांमध्येसुद्धा उष्माघात, डीहायड्रेशन आणि अशक्तपणा आदी त्रास होतात. पशू-पक्ष्यांची काळजी खूप महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी नेहमी पुरेसे स्वच्छ, पाणी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येकाने आपल्या घरात केली पाहिजे.
उष्माघातापासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. उदाहरणार्थ, भरपूर पाणी पिणे, थंड आणि आरामदायक ठिकाणी राहणे, हलक्या कपड्यांचा वापर करणे, उन्हात फिरताना थोडे थांबून विश्रांती घेणे, आणि गरजेनुसार हलक्या, सोप्या आहाराचा अवलंब करणे, इत्यादी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment