काजूचे उत्पन्न वाढवणे, जमिनीची धूप रोखणे आणि हरितक्षेत्र वाढवण्याचा उद्देश
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी विभागाने कोकणासह काजू उत्पादक अन्य जिल्ह्यांकरिता 'मागेल त्याला काजू कलमे' ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना २०२६-२७ या वर्षासाठीही राबवण्यात येत आहे. २८ एप्रिल २०२६पासून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना उच्च उत्पादन देणारी काजू कलमे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दर्जेदार काजूला देशांतर्गत, तसेच जागतिक बाजारपेठेत मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासोबतच जमिनीची धूप रोखणे आणि हरितक्षेत्र वाढवण्यासाठीही काजू लागवड उपयुक्त ठरणार आहे. या योजनेअंतर्गत प्रति शेतकऱ्याला कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त ५० काजू कलमे मोफत दिली जाणार आहेत. ही कलमे उच्च उत्पादन देणाऱ्या जातीची असतील. त्यांचा पुरवठा शासकीय रोपवाटिकेतून केला जाईल. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडीद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सात बारा उतारा, आधारकार्ड, हमीपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
संकेतस्थळ : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment