अमरावतीतील विद्यार्थ्याला अमृत संस्थेच्या योजनेचा लाभ
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना शासकीय टायपिंग व शॉर्टहँड (जीसीसी-टीबीसी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शुल्क परताव्याच्या स्वरूपात अर्थसाह्य दिले जाते.
या योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी गावचा रहिवासी ऋषीकेश विजयसिंग बैस या विद्यार्थ्याने घेतला. त्याने इंग्लिश टायपिंग (३० शब्दगती व ४० शब्दगती) अशा दोन्ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्याला एकत्रितपणे १३ हजार रुपयांच्या शुल्काचा परतावा अमृत संस्थेकडून देण्यात आला आहे.
ऋषीकेश सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, आर्थिक अडचणी असतानाही शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अमृत संस्थेच्या या मदतीमुळे मोठा आधार मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय सेवेसाठी आवश्यक पात्रता मिळत असून, त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढत आहेत.
प्रामाणिक, मेहनतीने परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी अमृत संस्था कायम उभी राहत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment