शासकीय टायपिंग परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यावर मिळाला संपूर्ण फीचा परतावा
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : येथील समीक्षा राजेंद्र जोशी या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेली शासकीय टायपिंग परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला १९ हजार ५०० रुपयांची परीक्षा फी परत मिळाली आहे.
अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, त्याअंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत. शासकीय जीसीसी-टीबीसी अर्थात संगणक टायपिंग व ऑनलाइन लघुलेखन (शॉर्टहँड) प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत परीक्षा शुल्क परत दिले जाण्याची एक योजना आहे. त्या योजनेचा लाभ समीक्षा जोशीला मिळाला आहे.
सिल्लोडमधील तिरुपती टायपिंग सेंटरमधून तिने टायपिंग कोर्स पूर्ण केला आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेली शासकीय टायपिंग परीक्षाही यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला १९ हजार ५०० रुपयांची परीक्षा फी परत मिळाली आहे.
अमृत संस्थेच्या या योजनेत १८ ते ५५ वयोगटातील उमेदवारांचा समावेश करण्यात येतो. अर्जदारांनी घोषणापत्र, शासकीय टायपिंग अथवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा स्वाक्षांकित निकाल, आधार कार्ड, तसेच बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना स्वयंरोजगार, नोकरी व व्यवसायासाठी सक्षम करणारी ठरत असून, पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक योगेश भास्करराव रोडे यांनी केले आहे.
समीक्षाचे वडील राजेंद्र जोशी यांनी याबद्दल संस्थेचे आभार मानले. 'अमृत संस्थेच्या माध्यमातून माझ्या मुलीची टायपिंग परीक्षेची एकोणीस हजार पाचशे रुपयांची फी परत मिळाली. सुरुवातीला मला यावर विश्वासच बसला नाही; पण प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यात प्रथमच शासनाकडून असा थेट लाभ मिळाला. यासाठी अमृत संस्था आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९४०३२००६०६
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृत संस्थेचे संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment