स्वतःसह परिसरातील तरुणांसाठीही उभा केला रोजगार; सातारा जिल्ह्यातील तरुणाची यशोगाथा
परळी (सज्जनगड, ता. जि. सातारा) : आजच्या काळात सुशिक्षित तरुण शहराकडे धाव घेत असताना, सातारा जिल्ह्यातील परळी (सज्जनगड) या दुर्गम भागातील अरविंद देशपांडे या तरुणाने मात्र उलट्या दिशेने प्रवासाचा मार्ग निवडला आहे. पुण्या-मुंबईची कॉर्पोरेट नोकरी सोडून या तरुणाने आपल्या मातृभूमीत पोह्यांची गिरण सुरू करून रोजगाराची नवी वाट शोधली आहे. या धाडसी निर्णयाला अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे भक्कम पाठबळ मिळाले आहे.
संकटातून संधीकडे वाटचाल
शहरातील नोकरीत मिळणारे चांगले वेतन आणि सुखसोयी असूनही, आपल्या भागात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द या तरुणाला स्वस्थ बसू देत नव्हती. परळी खोऱ्यातील दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि रोजगाराच्या संधींची कमतरता लक्षात घेऊन, त्याने कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे ठरवले. या विचारातूनच पोहा मिल अर्थात पोह्याची गिरण सुरू करण्याची संकल्पना आकारास आली.
अमृत संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ जिद्द असून चालत नाही, तर त्याला योग्य प्रशिक्षण आणि तांत्रिक मदतीची गरज असते. या तरुणाने 'अमृत' संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या माध्यमातून त्याला खालील प्रकारे मदत करण्यात आली.
प्रशिक्षण : व्यवसाय व्यवस्थापन आणि पोह्यांच्या निर्मितीचे तंत्र शिकवण्यात आले.
आर्थिक नियोजन : सरकारी योजना आणि वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, तसेच इतर तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.
प्रोत्साहन : दुर्गम भागात उद्योग उभा करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संस्थेने वेळोवेळी पाठबळ दिले.
स्थानिक रोजगाराला चालना
या पोहा मिलमुळे केवळ त्या तरुणाच्या कुटुंबाची प्रगती झाली नाही, तर परिसरातील पाच ते १० स्थानिक तरुणांना आणि महिलांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. दुर्गम भागातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी हा प्रकल्प हे एक उत्तम उदाहरण ठरत आहे.
'शहरात नोकरी करणे सुरक्षित होते; पण स्वतःचा उद्योग उभारण्यात जो आनंद आहे तो वेगळाच. परळीसारख्या भागात उद्योग करणे आव्हानात्मक होते; पण अमृत संस्थेच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. आता आमचा पोहा 'सज्जनगड' ब्रँड म्हणून ओळखला जावा, हेच आमचे स्वप्न असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत," अशी प्रतिक्रिया अरविंद देशपांडे यांनी व्यक्त केली.
परिसरातून कौतुकाचा वर्षाव
दुर्गम भागात असा धाडसी प्रयोग केल्याबद्दल या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कृषी आधारित उद्योगांची योग्य जोड मिळाल्यास ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो, हेच या प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विनायक पाठकजी, अमृत संस्था 9923197206
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 1 Comments
Girish Bokil
खरोखर प्रोत्साहित करणारे धाडस.
देशपांडे सरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
तसेच अमृत संस्थेचे देखील अभिनंदन.
अमृत संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहाय्यता अशीच खूप लोकांना मिळो आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यात मोलाचा वाटा राहो हीच सदिच्छा.
Write a Comment