दिनांक- २४ ते ३० ऑगस्टदरम्यान साजऱ्या होणाऱ्या संस्कृत सप्ताहानिमित्त, संस्कृत भाषेचा समृद्ध वारसा, वैशिष्ट्ये आणि आजच्या काळातील महत्त्व उलगडणारी ही विशेष लेखमाला - संस्कृतच्या ज्ञानवैभवाची ओळख करून देणारा एक नवा पैलू दररोजच्या लेखातून जाणून घेऊया. ‘देववाणी’ संस्कृतच्या समृद्ध विश्वाची नव्याने ओळख करून घेऊया!
लेख क्र.- १
‘संस्कृत’ हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, कालिदास, भास, भवभूती, पाणिनी, पतंजली अशी समृद्ध ज्ञानपरंपरा उभी राहते. पण संस्कृतकडे केवळ प्राचीन वारशाची भाषा म्हणून पाहणे म्हणजे तिच्या सामर्थ्याला एका कालखंडात बंदिस्त करणे होय. संस्कृत ही केवळ भूतकाळाची भाषा नाही; ती भारताच्या ज्ञानपरंपरेला वर्तमानाशी आणि वर्तमानाला भविष्याशी जोडणारी सशक्त ज्ञानभाषा आहे.
महाराष्ट्राचा संस्कृतशी असलेला संबंध तर अत्यंत जिवंत आहे. संतपरंपरेपासून तत्त्वज्ञानापर्यंत, धर्मशास्त्रापासून साहित्यापर्यंत, शिक्षणापासून सामाजिक विचारांपर्यंत संस्कृतचा प्रभाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत दिसून येतो. अनेक मराठी संतांनी संस्कृत ज्ञानपरंपरेतील विचार सामान्य जनांपर्यंत पोहोचवले. म्हणून संस्कृत ही केवळ एका विशिष्ट वर्गाची भाषा अशी धारणा इतिहासालाही आणि वर्तमानालाही न्याय देणारी नाही.
आज मात्र आपल्यासमोर एक नवा प्रश्न आहे—संस्कृतचे जतन करायचे की तिचे पुनरुज्जीवन करायचे? उत्तर स्पष्ट आहे : जतन आवश्यक आहे; पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे पुनरुज्जीवन.
संस्कृत विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडली पाहिजे. ‘संस्कृत शिकणे’ म्हणजे केवळ व्याकरण, पाठांतर किंवा परीक्षेपुरते अध्ययन न राहता संवाद, सर्जनशीलता, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि जीवनमूल्यांशी तिचे नाते विद्यार्थ्यांना अनुभवता आले पाहिजे.
आजच्या मुलाला संस्कृतमध्ये स्वतःची ओळख सांगता आली, आपल्या गावाची माहिती देता आली, कविता लिहिता आली, छोटा संवाद करता आला, डिजिटल व्हिडिओ तयार करता आला तर संस्कृत त्याच्यासाठी जिवंत भाषा बनेल.
यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज आहे. संस्कृत संभाषण केंद्रे, संस्कृत कथा-कथन, नाटिका, काव्यवाचन, गीत, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संस्कृत दिनदर्शिका, ‘आजचा संस्कृत शब्द’, ‘माझे गाव संस्कृतमध्ये’, ‘माझी संस्कृत कविता’ अशा उपक्रमांतून संस्कृतचा सहज परिचय करून देता येईल.
संस्कृत आणि प्रशासन यांच्यातील नातेही अधिक दृढ करता येईल. प्रशासकीय संज्ञांचे संस्कृत रूप, भारतीय ज्ञानपरंपरेशी संबंधित संदर्भ, योग, आयुर्वेद, पर्यावरण, न्याय, सुशासन आणि मूल्याधिष्ठित प्रशासन यांचा संस्कृत साहित्यातील संदर्भ घेऊन आधुनिक संवाद समृद्ध करता येऊ शकतो.
याचबरोबर संस्कृतला डिजिटल विश्वाशी जोडणे अत्यावश्यक आहे. आजच्या तरुणाईचा मोठा वेळ सामाजिक माध्यमांवर जातो. मग संस्कृतही तिथेच का दिसू नये? संस्कृत reels, podcasts, short videos, animated stories, digital quizzes, online courses आणि interactive content निर्माण झाला तर संस्कृतचा पोहोचविस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने संस्कृतचा एक अभिनव उपक्रम स्वीकारला तर या कार्याला राज्यव्यापी स्वरूप देता येईल. एका जिल्ह्यात संस्कृत नाट्यमहोत्सव, दुसऱ्या जिल्ह्यात संस्कृत डिजिटल स्पर्धा, तिसऱ्या जिल्ह्यात संस्कृत संभाषण अभियान, तर अन्यत्र संस्कृत-पर्यटन उपक्रम—अशी विविधता निर्माण होऊ शकते.
संस्कृतचा प्रसार केवळ संस्कृत शिकणाऱ्यांपुरता मर्यादित राहू नये. गृहिणी, युवक, ज्येष्ठ नागरिक, कलाकार, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांनाही संस्कृतच्या आनंदाशी जोडता आले पाहिजे.
कारण संस्कृत ही केवळ भाषा नाही. ती विचार करण्याची पद्धत आहे; ज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी आहे; भारतीय संस्कृतीची स्मृती आहे आणि भविष्याला दिशा देणारी शक्यता आहे.
संस्कृतला केवळ भूतकाळात जपायचे नाही; तिला वर्तमानात जगायचे आणि भविष्यामध्ये घेऊन जायचे आहे.
महाराष्ट्राने ही जबाबदारी स्वीकारली, तर संस्कृतचा पुनर्जन्म केवळ शैक्षणिक उपक्रम म्हणून होणार नाही; तो एक व्यापक सांस्कृतिक आणि ज्ञानचळवळीचा प्रारंभ ठरेल.
- डॉ .मंजूषा कुलकर्णी
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका
संस्कृत विदुषी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment