अमृतच्या योजनेमुळे तयार होत आहेत तरुण नव उद्योजक
वाशिम, प्रतिनिधी : व्यवसाय उभारण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा वाढता आर्थिक भार अनेक नवउद्योजकांसाठी मोठे आव्हान ठरतो. अशाच परिस्थितीचा सामना करणारे वाशिम येथील उद्योजक श्रीपाद जयवंतराव देशमुख यांना महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. श्रीपाद जयवंतराव देशमुख यांनी स्वतःचे आयुर्वेदिक औषधालय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग निवडला. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात भांडवल उभारण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. नव्याने सुरू झालेल्या व्यवसायामुळे कर्जावरील व्याजाचा मोठा आर्थिक भार त्यांच्यावर पडत होता. अशा परिस्थितीत अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. योजनेअंतर्गत श्रीपाद जयवंतराव देशमुख यांना ₹२,२०,७३५ (दोन लाख वीस हजार सातशे पस्तीस रुपये) इतका कर्ज व्याज परतावा मंजूर झाला. या आर्थिक सहाय्यामुळे कर्जावरील व्याजाचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला असून व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेण्यास त्यांना मदत झाली आहे. याबाबत बोलताना श्रीपाद जयवंतराव देशमुख म्हणाले, "व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात कर्जावरील व्याजाचा खर्च मोठा होता. अमृत च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे मला ₹२,२०,७३५ इतका लाभ मिळाला. या सहाय्यामुळे व्यवसायाला मोठा आधार मिळाला असून भविष्यात व्यवसायाचा विस्तार करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. या योजनेसाठी मी अमृत संस्थेचा मनःपूर्वक आभारी आहे." आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी समाज घडविण्याच्या उद्देशाने अमृत राबवत असलेल्या विविध योजनांपैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही नवउद्योजकांसाठी प्रभावी आधार ठरत आहे. अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अमृत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : AMRUT कार्यालय, वाशिम रूम क्र. २०१, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम मो. : 9112227634
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment