अमृत संवाद सेतू हा अमृत (AMRUT) तर्फे राबविण्यात येणारा विद्यार्थीकेंद्रित उपक्रम असून शिक्षण, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी यांना जोडणारा एक प्रभावी संवाद मंच आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांकडे योग्य कौशल्ये, स्पष्ट करिअर दृष्टी, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास असणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमृत (AMRUT) तर्फे "अमृत संवाद सेतू" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि समाज यांच्यात प्रभावी संवाद निर्माण करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अमृत संवाद सेतूच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योग-व्यवसाय, स्टार्टअप, शासकीय योजना तसेच बदलत्या रोजगार बाजारपेठेतील आवश्यक कौशल्यांची माहिती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून दिली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि ध्येय यानुसार योग्य करिअरची निवड करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मार्गदर्शक व्यक्तींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास, नेतृत्वगुण विकसित होण्यास आणि निर्णयक्षमता बळकट होण्यास मदत होईल. अमृत संवाद सेतू हा केवळ मार्गदर्शन कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारलेला एक प्रभावी संवाद मंच आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन संधींची ओळख होईल, रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील आणि स्वयंरोजगाराकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल. यामुळे सक्षम, आत्मनिर्भर आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देणारी युवा पिढी घडविण्यास निश्चितच हातभार लागेल. महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपलब्ध होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंदिया जिल्हा अमृत कार्यालय तर्फे करण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment