आपल्या आयुष्यात आपण इतरांशी कसे वागतो, यावरच आपल्या भविष्यातील अनुभव अवलंबून असतात. ही बोधकथा याच जीवनसत्याची सुंदर जाणीव करून देते.
एक साधू यात्रेला निघालेला असतो. वाटेत त्याला एका मागोमाग एक अशी गावं लागतात. एका गावातून तो जात असताना तो कोणीतरी ढोंगी साधू आहे असे समजून गावकरी त्याला शिव्या देत वाटेल तसं बोलतात. पण तो साधू गावकऱ्यांच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करीत पुढील गावाकडे मार्गक्रमण करतो. त्याच्या मागोमाग गावातील काही लोकही त्या दुसऱ्या गावी येत असतात. साधूचे दुसऱ्या गावात आगमन होताच तेथील गावकरी मात्र त्या सत्पुरुषाचा सन्मान करतात. त्याला हार घालतात, त्याची पूजा करतात आणि मिठाई अर्पण करतात. त्यावेळी तो साधू गावकऱ्यांना सांगतो,
"मला यातले काहीही नको. सर्व प्रसाद तुम्हीच वाटून घ्या."
त्या सत्पुरुषाने दिलेला प्रसाद समजून गावकरी आनंदाने सर्व गावात तो प्रसाद वाटतात. ज्यांनी त्या साधूला शिव्या दिल्या होत्या ते मागील गावातील लोक मात्र एकमेकांकडे पहात विचार करतात, "आपण तर शिव्या दिल्या होत्या आता त्याच वाटून घेतल्या पाहिजेत. आपण जे देतो तसेच आपल्याला मिळते." तेव्हा कोणालाही सदिच्छा किंवा शिव्या द्यायच्या ते आपणच ठरवले पाहिजे.
तात्पर्य:- जे पेराल तेच उगवते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment