वाशिममधील लाभार्थ्याचे अनुभवामृत; अमृत संस्थेकडून २६,६०६ रुपयांचा पहिला व्याजपरतावा
मी अशोक वसंतराव देशपांडे, वाशिम जिल्ह्यातील करंजालाड येथील व्यावसायिक आहे. पूर्वी माझे आयुर्वेदिक औषधांचे एक केंद्र होते. प्रचंड काम करण्याची क्षमता माझ्यात आहेच आणि मेहनतही सुरूच होती; मात्र अपेक्षित यश मिळत नव्हते. त्याच दरम्यान माझी भेट झाली अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांच्याशी. त्यांनी अमृत संस्थेच्या योजनांची माहिती दिली. त्यातील वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा मला व्यवसायवृद्धीसाठी उपयोग होईल, असे त्यांनी सुचवले.
मी आवश्यक कागदपत्रे गोळा केली आणि लगेच कर्ज व्याजपरतावा योजनेचा फॉर्म भरला. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले आणि व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने तयारीला लागलो. आयुर्वेदिक औषधांच्या सोबतीला अॅलोपॅथिक औषधांची विक्रीही करायचे ठरवले. त्यामुळे कर्जाच्या पैशातून दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरला. त्यामुळे साहजिकच आर्थिक व्यवहार वाढले, नफा वाढला. सुरुवातीला मला असे वाटायचे, की आपण कर्ज काढले तर त्याचे मोठ व्याज आपण कसे भरणार? इतका हप्ता आपल्या झेपेल का? पण या सर्व प्रश्नांची उत्तरे अमृत संस्थेच्या रूपाने मला मिळाली. खरोखर या योजनेमुळे माझ्या व्यवसायात फार फायदा झाला. मला आतापर्यंत अमृत संस्थेच्या योजनेतून २६ हजार ६०६ रुपयांचा व्याजपरतावा मिळाला आहे. म्हणूनच माझा कर्जाचा भार हलका झाला आहे. लक्ष्यित गटातील घटकांना माझे असे आवाहन आहे, की अधिकाधिक जणांनी उद्योग-व्यवसाय सुरू करावेत. अमृत संस्थेची साथ असताना घाबरण्याचे कारण नाही. 'अमृत'सारखी संस्था सुरू करून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपयुक्त योजना राबवत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप धन्यवाद. नवीन उद्योग उभारणाऱ्यांनाही खूप शुभेच्छा!
- अशोक वसंतराव देशपांडे, करंजालाड
.........
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. याचाच अर्थ असा, की दोन वर्षांच्या कालावधीतील कर्ज व्याजमुक्त होते. त्यामुळे बचत झालेली रक्कम व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरणे व्यावसायिकांना शक्य होऊ शकते.
अमृत संस्थेच्या या आणि अन्य योजनांच्या अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment