बीज प्रक्रिया ही पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक, जैविक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा; अधिक उत्पादनासाठी प्रभावी उपाय
जालना: खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण होते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत मिळते; महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या माहितीसाठी हे आवाहन करण्यात आले आहे.
बीज प्रक्रिया ही पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक, जैविक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. या प्रक्रियेमुळे बियाण्यांचे मातीतील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते, उगवण एकसमान व चांगली होते तसेच रोपांची वाढ जोमदार राहते. परिणामी पिकांची वाढ निरोगी होऊन उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि मका यांसारख्या खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया विशेषतः फायदेशीर ठरते. जैविक बीज प्रक्रियेमध्ये रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम यांसारख्या जीवाणू संवर्धकांचा वापर केल्यास पिकांना आवश्यक नत्र उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास हातभार लागतो.
अनेक शेतकरी बीज प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात. मात्र, अत्यल्प खर्चात अधिक उत्पादन मिळवून देणारे हे एक प्रभावी आणि शाश्वत तंत्रज्ञान आहे. बीज प्रक्रियेमुळे रोपांचे प्रारंभीचे संरक्षण होऊन रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, पिकांची जोमदार वाढ होते आणि उत्पादन खर्चातही बचत होते.
अमृत संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, पेरणीपूर्वी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. आधुनिक आणि शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनवाढीसह शेती अधिक किफायतशीर व फायदेशीर होण्यास मदत होईल.
-संकलित
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment