छत्रपती संभाजीनगरमधील नागेश भाले यांना ८६,३९४ रुपयांचा पहिला लाभ
छत्रपती संभाजीनगर : येथील नागेश माधवराव भाले हे ऑटोमोबाइल्स व्यवसायात कार्यरत असून, व्यवसायवाढीसाठी त्यांनी १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेसाठी अर्ज केला होता. सर्व निकषांत बसल्यामुळे तो अर्ज मंजूर झाला आणि त्यांना कर्जावरील व्याजाच्या परताव्याचा ८६ हजार ३९४ रुपयांचा पहिला हप्ता अलीकडेच देण्यात आला.
आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचा व्यवसाय उभा करणे किंवा तो वाढवणे यासाठी भांडवलाची मोठी गरज असते. विशेषतः ऑटोमोबाइल्ससारख्या तांत्रिक आणि खर्चिक क्षेत्रात व्यवसाय करताना कर्ज घेणे अपरिहार्य ठरते; मात्र कर्जावरील व्याजाचा वाढता बोजा अनेक व्यावसायिकांसाठी अडचणीचा ठरतो. अशा वेळी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना गरजू व्यावसायिकांसाठी मोठा आधार ठरत आहे.
याबद्दल नागेश भाले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी त्यांनी सांगितले, की 'अमृत संस्थेच्या योजनेमुळे छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना खऱ्या अर्थाने आधार मिळतो. योग्य माहिती घेऊन वेळेत अर्ज केल्यास सरकारी योजना नक्कीच उपयोगी ठरतात.'
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. याचाच अर्थ असा, की दोन वर्षांच्या कालावधीतील कर्ज व्याजमुक्त होते. त्यामुळे बचत झालेली रक्कम व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरणे व्यावसायिकांना शक्य होऊ शकते.
अमृत संस्थेच्या या आणि अन्य योजनांच्या अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment