लाडक्या भक्तासाठी श्री विष्णू प्रत्यक्ष अवतरल्याची कथा
‘कशास काशी, गया, अयोध्या जावे रामेश्वरी... असता श्रीहरी आमुचे घरी..’ अशा शब्दांत ज्याच्या महतीचे वर्णन केले जाते, ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे श्री भगवंत मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र भूमीत भगवान श्री विष्णू स्वतः माता लक्ष्मीसह निवास करतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.
या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी १७६०मध्ये नानासाहेब पेशव्यांनी, १८२३मध्ये इस्ट इंडिया कंपनीने आणि पुढे १८७४मध्ये ब्रिटिशांनी सनदा दिल्या होत्या. या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या गावाच्या सरपंचाप्रमाणे या मंदिराच्या प्रमुखाला आजही सरपंच म्हणून ओळखले जाते.
इतिहास आणि पुराणांनुसार, बार्शीचे मूळ नाव बारस (द्वादशी) असे होते. हे ठिकाण द्वादशी क्षेत्र म्हणून ओळखले जाई. येथील विष्णूभक्त राजा अंबरीश याने साधनद्वादशी व्रत सुरू केले होते. हे व्रत पूर्ण झाल्यास इंद्राचे आसन डळमळीत होईल या भीतीने इंद्राने दुर्वास ऋषींना त्याचा व्रतभंग करण्यासाठी पाठवले. दुर्वास ऋषींच्या क्रोधातून निर्माण झालेल्या दैत्यापासून अंबरीश राजाचे रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू येथे प्रकट झाले. त्यांनी सुदर्शन चक्राने दैत्याचा संहार केला. संकट टळल्यानंतर राजा अंबरीश यांच्या विनंतीवरून श्री विष्णूंनी भगवंत या नावाने याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करण्याचे मान्य केले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment