ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले गाव
अहिल्यानगर शहरापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर नगर-बीड रस्त्यावर भातवडी (भातोडी) गाव असून, भगवान नृसिंह यांचे अहिल्यानगरमधील एकमेव पुरातन मंदिर येथे आहे. या गावात सुमारे ४००-४५० वर्षे जुना तलाव आहे. त्या तलावाच्या जवळ कलावंतीण महाल, एकंगबाबी मैदान आणि प्रसिद्ध नृसिंह मंदिर आहे. येथे मंदिरात नृसिंह मूर्तीऐवजी तांदळा आहे. भातोडी गावातील हे नृसिंह मंदिर १४व्या शतकातील आहे, असे म्हटले जाते. मंदिरातील दगडावर सुरेख नक्षीकाम आहे. तसेच देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
या भगवान नृसिंह मंदिराची स्थापना इसवी सन १३००-१४००च्या काळात झाली असावी, अशी मान्यता आहे. त्या काळी शाही दरबारात कान्हो नर्सी नावाचे प्रधान होते. त्यांनी या नृसिंह मंदिराची स्थापना केली आहे. भक्कम दगडी तटबंदी करून त्यावर मंदिर बांधलेले आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे. मंदिराच्या समोर मेहकरी नदी आहे. या नदीचा उगम जवळच्या गर्भगिरी डोंगररांगेतील परिसरातून झालेला आहे. या मंदिराचे प्रतिरूप पाकिस्तानात कराचीमधील नरसिमपाल या भागात आहे असे बोलले जाते. दर वर्षी नृसिंह जयंतीला येथे उत्सव साजरा होतो. त्या वेळी राज्य आणि देशभरातून भाविक या गावाला आणि मंदिराला भेट देतात. नृसिंह मंदिरात पूजा करण्याचा मान पूर्वीपासून भोपे कुटुंबाकडे आहे. सध्या रमेश भोपे (देवा) हे मंदिरातील पूजेची जबाबदारी सांभाळतात.
भातोडी गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. १६२४ साली झालेली भातवडीची लढाई गनिमी काव्यासाठी सुप्रसिद्ध आहे. या लढाईमध्ये शहाजीराजे यांनी मोठा विजय मिळवला. परंतु, या लढाईमध्ये शहाजीराजेंचे छोटे बंधू व छत्रपती शिवरांयाचे चुलते शरीफजीराजे भोसले हे धारातीर्थी पडले. शरीफजीराजे भोसले यांचे समाधिस्थळही या ठिकाणी आहे.
एकंदरीतच, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी हे ठिकाणी उत्तम आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment