खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजना लक्षित गटापर्यंत पोहोचवण्याचे जबरदस्त अभियान सुरू आहे. त्यासाठी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी अक्षरशः पायाला चाके लावून फिरत आहेत. त्याविषयी…
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजना लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्याचे जबरदस्त अभियान सुरू आहे. या अभियानादरम्यान लक्ष्यित गटातील विविध संघटनांशी चर्चा करणे, त्यांच्या गरजा आणि अडचणी जाणून घेणे, अगदी ग्रामीण भागातील शेवटच्या लाभार्त्यांचे मत ऐकून घेणे आणि त्याला मदत करण्यासाठी शासकीय चौकटीत राहून चाकोरीबाहेरचा विचार करणे, लाभ मिळवून देणे, नवीन योजनांबद्दल विचार करणे आदी महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत. या सर्व कामांमागची प्रेरणा आहेत ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सर! शासकीय अधिकारी म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर येणाऱ्या ठरावीक प्रतिमेला छेद देत, प्रत्यक्ष लक्ष्यित गटाच्या समस्या जाणून घेऊन, घेतलेले व्रत अतिशय कणखरपणे पूर्ण करीत असलेले जोशी साहेब हे शासनाच्या काही मोजक्या शासकीय अधिकाऱ्यांपैकी आहेत.
गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडलेली असतानाही नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे यांसारख्या जास्त प्रमाणात थंडी असलेल्या भागात अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार प्रचाराचे काम जोरात सुरू आहे. विशेषतः युवक/युवतींनी स्वयंरोजगार निर्माण करावा, नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हावे यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे, व्यवसाय मार्गदर्शन, (व्यवसायासाठी) वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा यांसारख्या योजना यांच्या माध्यमातून युवाशक्तीचे सक्षमीकरण केले जात आहे. काळाच्या पुढे जाऊन ‘अमृत ड्रोन प्रशिक्षण’सारख्या अॅडव्हान्स प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी, फोटोग्राफी आणि इव्हेंट मॅनेजमेंट, लँड मॅपिंग, डिझास्टर मॅनेजमेंट, ड्रोन फॉर डिलिव्हरी, ट्रेन द ट्रेनर यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. अनेक युवक याचा लाभही घेत आहेत.
या सर्वांमागे असलेले प्रभावी नेतृत्व अर्थात विजय जोशी सरांनी सकाळी वेळेपूर्वी ऑफिसला येणे, वेळेनंतर थांबणे, सामान्यांतील सामान्य माणसालाही आपुलकीची आणि सन्मानाची वागणूक देणे, योजना प्रभावीपणे राबविणे आदी वैशिष्ट्यांमुळे आपला वेगळा ऑरा निर्माण केला आहे. अमृत संस्थेच्या यशात त्यांचा वाटा सिंहाचा आहे. अमृत संस्थेला राजमान्यतेसोबत लोकमान्यता मिळत आहे ती याच कारणाने!
अमित सामंत
कोकण विभागीय व्यवस्थापक, अमृत संस्था
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment