ब्राह्मण समाजातील तरुण पिढीने अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योग उभारण्याचे आवाहन
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि नरसिंहपूर ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने नरसिंहपूर येथे अमृत मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. खुल्या प्रवर्गासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या योजनांची माहिती ब्राह्मण समाजापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने अमृत मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नरसिंहपूर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे स्वागत आशिष कुलकर्णी यांनी व अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांचे स्वागत योगेश कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. नवनवीन कौशल्ये शिकून तरुणांनी आपल्या पायावर उभे राहण्याची गरज असल्याचे प्रास्ताविकात ओंकार कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच आपल्या समाजातील व्यवसायिकांना व महिलांना उद्योग-व्यवसाय उभा करण्यासाठी अमृत संस्थेच्या योजना उपयोगी असून, त्याचा समाजाला लाभ व्हावा यासाठी हा मेळावा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले. ब्राह्मण समाजातील तरुण पिढीने अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा व उद्योग उभे करावेत असे आवाहन त्यांनी केले. व्यवसाय-उद्योग उभा करून ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांनी आवश्यक कागदपत्रे व निवड निकषांची सविस्तर माहिती दिली.
समारोपात संतोष जोशी यांनी अमृत संस्थेचे व उपस्थितांचे आभार मानले. समाजबांधव आणि भगिनींनी या योजनांचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा असे आवाहन केले. या वेळी तेथील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी अमृतमित्र म्हणून समाजजागृतीचे काम स्वयंसेवी पद्धतीने करण्याची तयारी दर्शवली. या कार्यक्रमाला सर्व वयोगटांतील समाजबांधव उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
९११२२२८७६६ / ७९७२८३०७५७ / ८२७५३७८०१९
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय,
अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर,
राजवाडा, सांगली ४१६४१६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment