पन्नासाव्या वर्षी सुरुवात करून यशस्वी झालेल्या उद्योजिका
आपण कोणतीही नवीन गोष्ट करतो तेव्हा सर्वप्रथम एवढ्या मोठ्या वयात हे धाडस करता येईल का, हीच शंका मनात येते. परंतु कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वयाचे बंधन नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फाल्गुनी नायर.
फाल्गुनी नायर या एक यशस्वी भारतीय उद्योजिका आणि नायका या सौंदर्य व जीवनशैलीविषयक रिटेल कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी आपल्या करिअरमध्ये मोठे धाडस दाखवून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्या भारतातील सर्वांत श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला अब्जाधीश बनल्या आहेत. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६३ रोजी मुंबईत झाला. त्यांनी मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर IIM अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवली. १९८७मध्ये त्यांचा विवाह झाला. व्यवसायात येण्यापूर्वी त्यांनी सुमारे २० वर्षे कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले आणि त्या तिथे व्यवस्थापकीय संचालक होत्या.
२०१२मध्ये वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून 'नायका'ची सुरुवात केली. महिलांना दर्जेदार सौंदर्यप्रसाधने एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावीत हा त्यांचा मुख्य उद्देश होता. २०२१मध्ये जेव्हा नायकाचा आयपीओ शेअर बाजारात आला, तेव्हा कंपनीचे मूल्य प्रचंड वाढले आणि फाल्गुनी नायर यांची संपत्ती अनेक अब्ज डॉलर्सवर गेली. त्या भारतातील दोन सेल्फ मेड महिला अब्जाधीशांपैकी एक आहेत.
२०२१मध्ये त्यांना 'EY Entrepreneur of the Year' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९मध्ये फोर्ब्ज एशियाने त्यांना 'आशियातील पॉवर बिझनेसवूमन' म्हणून नामांकित केले होते. त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला समजते, की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वय महत्त्वाचे नाही तर महत्त्वाची आहे ती आपली इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment