पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताने विजय मिळवला आणि स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली, तो दिवस म्हणजे १६ डिसेंबर. विजय दिन म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या दिवसाबद्दल...
भारत दर वर्षी १६ डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करतो. हाच बांगलादेश या नवीन राष्ट्राच्या निर्मितीचा दिवस आहे. भारतीय सैन्याने १९७१ साली पाकिस्तानवर निर्णायक विजय नोंदवला आणि पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) मुक्त करून बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली.
हा लढा पूर्व पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध होता. पाकिस्तानी लष्कराने जनरल याह्या खान यांच्या नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तानात बंगाली लोकांवर प्रचंड दडपशाही आणि नरसंहार केला. बंगाली राष्ट्रवाद्यांनी या अत्याचारांविरुद्ध स्वातंत्र्याची मागणी बुलंद केली. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची ही दडपशाही थांबवण्यासाठी भारतीय लष्कराला हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले. ४ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट सुरू केले. यानंतर भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचा पराभव केला. शेवटी, १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि बांगलादेश या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. ढाका येथे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. जगाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे आत्मसमर्पण मानले जाते. यासह नऊ महिन्यांचे स्वातंत्र्ययुद्ध संपले आणि बांगलादेश स्वतंत्र देश झाला.
या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून भारत आणि बांगलादेश दर वर्षी विजय दिवस साजरा करतात. या वेळी दोन्ही देशांचे माजी सैनिक आणि अधिकारी समारंभात सहभागी होतात. १९७१चे युद्ध हा केवळ पाकिस्तानचा पराभवच नव्हता, तर ते भारताच्या जागतिक मुत्सद्दी आणि लष्करी सामर्थ्याचे प्रतीक बनले. हे युद्ध भारत आणि बांगलादेश यांच्यातील मैत्रीची एक नवीन सुरुवात होती.
........
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment