प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने भारताच्या वैभवाचा घेतलेला हा आढावा
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, तिला चार हजारांहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. या दीर्घ प्रवासात विविध परंपरा, रीतिरिवाज आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडत गेला आहे. तो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या राष्ट्राचा इतिहास त्याच्या उत्क्रांतीच्या भव्यतेची साक्ष देतो. गुलामगिरीच्या जोखडाखाली दबलेला देश ते आज जागतिक पातळीवर आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असा झालेला भारताचा प्रवास थक्क करणारा आहे. या परिवर्तनामागे सर्वांत मोठी शक्ती म्हणजे भारतीय जनतेच्या मनातील राष्ट्रभक्तीची ज्वाला. याच राष्ट्रनिष्ठेच्या बळावर देशाने प्रगतीचे हे शिखर गाठले आहे. या महान परिवर्तनामुळे देशात आणि परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत होते. तो अभिमान, ती ओळख आणि ती ज्वाला सदैव प्रज्ज्वलित राहावी, हीच या प्रजासत्ताकदिनी इच्छा!
आम्हा भारतीय लोकांना पाश्चात्य जगाचे वेड आहे, जणू काही सगळे शोध पाश्चात्य लोकांनीच लावले आहेत. परंतु तुम्हाला वाचून नवल वाटेल, की कितीतरी शोध सर्वप्रथम भारतात लागले आहेत. भारताने जगाला विज्ञानापासून गणितापर्यंत अनेक महत्त्वाचे शोध दिले आहेत. भारतात लागलेले काही प्रमुख शोध खालीलप्रमाणे आहेत :
• शून्य (Zero): शून्याचा शोध आणि त्याचा गणिती वापर महान भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांनी केला.
• दशमान पद्धत (Decimal System): गणितातील दशमान पद्धतीचा विकास प्राचीन भारतात झाला. त्यामुळे मोठी गणिती आकडेमोड करणे सोपे झाले.
• बौद्धिक खेळ (Chess): बुद्धिबळ या खेळाची सुरुवात भारतात 'चतुरंग' या नावाने झाली.
• आयुर्वेद (Ayurveda): जगातील सर्वांत जुनी वैद्यकीय पद्धत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुर्वेदाची निर्मिती भारतात झाली.
• प्लास्टिक सर्जरी : सुश्रुत यांना 'प्लास्टिक सर्जरीचे जनक' मानले जाते. त्यांनी हजारो वर्षांपूर्वी या शस्त्रक्रियेचे तंत्र विकसित केले होते.
• योग (Yoga): शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठीची योगाभ्यास पद्धत ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.
• बटण (Buttons): बटणांचा वापर सर्वप्रथम सिंधू संस्कृतीमध्ये (Indus Valley Civilization) सजावटीसाठी केला जात असे.
• कापूस उत्पादन : कापसाची लागवड आणि त्यापासून कापड तयार करण्याचे तंत्र सर्वप्रथम भारतीयांनी विकसित केले.
• साखर (Sugar): उसापासून साखर तयार करण्याची प्रक्रिया भारतातच सुरू झाली.
• यूएसबी (USB): आधुनिक काळातील 'युनिव्हर्सल सीरियल बस'चा (USB) शोध भारतीय-अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ अजय भट्ट यांनी लावला.
याशिवाय रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथात वर्णन केलेल्या काही घटना या वैज्ञानिक शोधांचे द्योतक आहेत. उदा. रावणाचे पुष्पक विमान, हनुमानाचे सूक्ष्म रूप व विराट रूप धारण करणे, राक्षसांकडे व देवतांकडे असणाऱ्या मायावी शक्ती, महाभारतात शंभर कौरव व त्यांचा जन्म, पितामह भीष्म यांचे इच्छामरण अशा अनेक गोष्टींना काही शास्त्रीय आधार आहेत. मुळात रामायण, महाभारत खरेच घडून गेले आहे. ते सगळे काल्पनिक नाही, हे आता भौगोलिक आधारांवरही सिद्ध होत आहे. भारताने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे भगवद्गीता. हा फक्त एक धर्मग्रंथच नाही, फक्त तत्त्वज्ञानच नाही, तर ती जगण्याची एक कला आहे. त्यातील शिकवण कालातीत आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' या आधारातून फक्त एका माणसासाठी, एका धर्मासाठी नाही तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेली ग्रंथरूपी भेट आहे.
'भारत माझा देश आहे' असे आपण प्रतिज्ञेत म्हणतो. आपण प्रत्येकाने खरेच या संकल्पनेने वागलो तर भारत पुन्हा परमवैभवापर्यंत जाईल, हे नक्की!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment