मराठीतील प्रसिद्ध कवी, साहित्यिक माधव जूलियन यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ही थोडक्यात माहिती...
'प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई' ही आईचे वर्णन करणारी कविता ऐकली, की कोणाचेही डोळे पाणवतात. आईचे इतके सुंदर वर्णन कदाचित कोणत्याच कवितेत नसावे. ही कविता रचली आहे माधव जूलियन यांनी.
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी बडोदा येथे झाला. ते रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या जूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी 'जूलियन' असे टोपणनाव धारण केले. याशिवाय 'गॉड्ज गुड मेन' या कादंबरीतील नायिका 'जूलियन' या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी जूलियन हे नाव घेतले असेही सांगितले जाते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव जूलियनांनी दित्जू, मा. जू. आणि एम. जूलियन या नावांनीही लेखन केले आहे. त्यांनी कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले. तो उत्कृष्ट संपादनाचा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लेखन इंग्रजीतही आहे. पटवर्धनांनी कवितांव्यतिरिक्त भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचा पुरस्कार करणाऱ्या पटवर्धनांनी 'भाषाशुद्धी-विवेक' हा ग्रंथ लिहिला. कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची या ग्रंथात समाविष्ट आहे. नाशिकमध्ये १९३३ साली झालेल्या महाराष्ट्र कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या (१९३४) काव्य शाखेचे ते अध्यक्ष होते. १९३५ मध्ये बडोदे सरकारकडून त्यांचा साहित्य सत्कार करण्यात आला. १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी त्यांचे निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment