देशातील एक महत्त्वाचे केंद्र
भारत आता अनेक बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. कोणताही देश तेव्हाच प्रगतिपथावर जातो, जेव्हा उत्पादन, विक्री याचबरोबर त्या देशात संशोधन वाढीस लागते. भारतासारख्या देशाला दीर्घकालीन मुदतीच्या ऊर्जास्रोताची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन तत्कालीन भारत सरकारने अणुऊर्जा प्रकल्प हाती घेतला. त्याचाच एक भाग म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र. २० जानेवारी हा या केंद्राचा स्थापना दिवस.
भाभा अणुसंशोधन केंद्र भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे आद्य प्रणेते होमी जहांगीर भाभा यांच्या नावाने ओळखण्यात येणारे व आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले भारतातील अग्रेसर अणुसंशोधन केंद्र आहे. भारतातील दीर्घ मुदतीच्या विद्युत ऊर्जेची गरज भागविण्याकरिता १९४८मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. देशातील अणुऊर्जेबद्दलच्या सर्व कार्याची जबाबदारी या आयोगाकडे देण्यात आली. अणुऊर्जेचा विकास व वापर यांसंबंधीचे सर्व प्रश्न, अणुकेंद्रीय तंत्राचा शेती, वैद्यक व उद्योगधंदे यांतील विविध समस्यांकरिता उपयोग करणे व विविध कार्यक्षेत्रात त्यावर संशोधन व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. भारत सरकारने १९५४ साली स्थापन केलेल्या स्वतंत्र अणुऊर्जा खात्याकडे अणुऊर्जा कार्यक्रम कार्यान्वित करण्याचे काम सोपवलेले होते. अणुऊर्जाविषयक सर्व संशोधन व विकासकार्य मात्र तुर्भे (मुंबई) येथील अणुसंशोधन केंद्रात केले जाते. या केंद्राचे औपचारिक उद्घाटन त्या वेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २० जानेवारी १९५७ रोजी झाले. पुढे भाभा यांच्या स्मरणार्थ जानेवारी १९६७मध्ये या केंद्राचे ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ असे नामकरण करण्यात आले. संशोधनाकरिता भारतात ज्या प्रयोगशाळा उपलब्ध आहेत, त्यांमध्ये हे केंद्र सर्वांत मोठे व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे आहे. स्थापना झाल्यापासूनच्या काळात या केंद्रात अनेक कार्यक्रम संशोधक गट निर्माण झालेले असून, विविध ज्ञानक्षेत्रांतील आधुनिक सुविधा येथे विकसित करण्यात आलेल्या आहेत. या संस्थेचे मुख्यालय ट्रॉम्बे (मुंबई) येथे आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment