भारोत्तोलन विश्वातील चमकता तारा
भारोत्तोलन हा विशेष कौशल्याचा भाग आहे. इथे केवळ शक्तीचा उपयोग नाही, तर कौशल्यही लागते. एवढे वजन लीलया उचलणे तितकेसे सोपे नाही. हे कसब येण्यासाठी चिकाटीने आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातही महिला भारोत्तोलक स्पर्धकांनासुद्धा हे कौशल्य येणे गरजेचे असते. त्यामुळे हा खेळप्रकार अतिशय विशेष मानला जातो. अशीच एक महिला खेळाडू म्हणजे के. मल्लेश्वरी अर्थात कर्णम मल्लेश्वरी.
कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्म श्रीकाकुलम येथे १ जून १९७५ रोजी झाला. १९९०मध्ये बंगलोर येथील खेळाडूंच्या कॅंपमध्ये मल्लेश्वरीला राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेत्या श्यामलाल सलवान यांनी हेरले आणि भारोत्तोलन स्पर्धेसाठी उद्युक्त केले. तेव्हापासून मल्लेश्वरीला या खेळात रस निर्माण झाला आणि तिने त्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली. वर्षभरातच भारोत्तोलन करणाऱ्या खेळाडूंच्या भारतीय चमूसाठी तिचे नाव चर्चेमध्ये आले. मल्लेश्वरीच्या करिअरची सुरुवात जुनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेपासून केली. १९९२ साली मल्लेश्वरीने आशियाई स्पर्धेत ३ रौप्य पदके जिंकली. त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेत ३ कांस्यपदके जिंकली; पण तिचे खरे यश तिने सिडनी येथे डिसेंबर २०००मध्ये मिळवलेल्या कांस्य पदकात आहे. तिने स्नॅच प्रकारात ११० किलो वर्गात आणि क्लीन अँड जर्क प्रकारात १३० किलो वजन उचलले. अशा प्रकारे एकूण २४० किलो वजन उचलल्यामुळे मल्लेश्वरी भारतासाठी भारोत्तलन स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला ठरली.
अशा प्रकारे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. १९९४ मध्ये तिला अर्जुन पुरस्कार आणि १९९९मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळाला. तिला पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. एक अवघड खेळ, त्यातही महिला स्पर्धक आणि छोट्याशा गावातून आलेली असतानाही तिने मिळवलेले हे यश नक्कीच खूप मोठे आहे. तिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अनेक तरुण मुली या क्षेत्रात येत आहेत. आता तर शासनातर्फे अनेक सोयी-सुविधाही उपलब्ध होत आहेत. मल्लेश्वरीचा हा वारसा आपल्या भारतीय तरुणी नक्कीच पुढे नेतील यात शंका नाही.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment