महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले जागतिक कीर्तीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा १८ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
आपला भारत कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या विकासात शेतकरी वर्गाचे फार मोठे योगदान आहे. मराठी मातीत जन्मलेले आणि शेतीत संशोधन करणारे एक थोर कृषी शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे. त्यांचा जन्म सात नोव्हेंबर १८८४ रोजी वर्धा येथे झाला. शालेय शिक्षणानंतर ते १९११ मध्ये अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मेक्सिकोत गेले. १९२०पासून ते १९४७पर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीकनिर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रिड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याची जात, कमी पावसात भरपूर उतारा देणारी आणि समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी अशी पीकजात आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषी संचालक म्हणून नेमले होते.
मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी त्यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतींचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली. त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षातून दोनदा पीक देणारी जात त्यांनी विकसित केली. शेतकर्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांबद्दलच्या पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. मसाल्याच्या अनेक पिकांची त्यांनी मेक्सिकोत शेती करून दाखवली. १९०८पासून त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. अशा या थोर शास्त्रज्ञाचे १८ जानेवारी १९६७ रोजी निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment