चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स
कुस्तीपासून ते नेमबाजीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यापैकीच एक असलेली महिला खेळाडू म्हणजे अंजली भागवत. तिने तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय, ती देशातील एकमेव खेळाडू आहे जिने नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब जिंकला आहे.
अंजलीला लहानपणापासून नेमबाजीत रस नव्हता. एकदा कॉलेजमध्ये असताना, अंजलीच्या कॉलेजमध्ये एनसीसी आंतरमहाविद्यालयीन शूटिंग स्पर्धा सुरू होती. तिची एक सहकारी कॅडेट स्पर्धेत सहभागी होणार होती; पण ती अचानक आजारी पडली. त्यामुळे अंजलीला सहभागी होण्यास सांगण्यात आले. अशा प्रकारे अंजलीची पहिल्यांदाच रायफल शूटिंगशी ओळख झाली. याचदरम्यान अंजलीची महाराष्ट्राच्या महिला नेमबाजी संघात निवड झाली. १९८८मध्ये राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले. यासह, तिने विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. १९९५मध्ये तिने खेळामध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकले.
चार वर्षांनंतर अंजलीने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. या वेळी तिने हंगेरियन प्रशिक्षक लास्झलो स्झुक्साक यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि नंतर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले. खेळातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला सिडनी ऑलिंपिकमध्ये स्थान मिळाले. ती तिच्या पहिल्याच ऑलिंपिक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली होती.
२००२मध्ये अंजलीने म्युनिक येथे झालेल्या विश्वचषकात सुवर्णपदक जिंकले. अंजलीला या खास सामन्याबद्दल काहीही माहिती नव्हती. सामन्याच्या फक्त पाच मिनिटे आधी तिला खेळाचे नियम सांगण्यात आले होते. असे असूनही, ती अंतिम फेरीत पोहोचली. या सामन्यात तिने सुवर्णपदक जिंकले. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, तिने एकूण ३१ सुवर्ण, २३ रौप्य आणि सात कांस्यपदके जिंकली आहेत. अंजलीने राष्ट्रकुल स्पर्धेत १२ सुवर्णपदके जिंकली आहेत. तिच्या उत्कृष्ट क्रीडा कामगिरीसाठी तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment