सेवा परमो धर्मः।
आपल्या शूर जवानांमुळे आपण निर्धास्तपणे जगू शकतो. कोणतेही युद्ध असो वा देशांतर्गत कलह, आपले जवान या सगळ्या परिस्थितीला अतिशय सक्षमपणे तोंड देतात. भारतीय लष्कराची स्थापना १५ जानेवारी १९४९ रोजी झाली. म्हणून १५ जानेवारी हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो.
१५ जानेवारी १९४९ या दिवशी फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. शत्रूला हरवण्यात, देशाचे संरक्षण करण्यात भारतीय लष्कराने नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली. त्या दिवसाचे स्मरण म्हणून दर वर्षी १५ जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो. १९४९मध्ये ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून करिअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. त्याच वर्षी लष्कर दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. ब्रिटिशांच्या सुमारे २०० वर्षांच्या राजवटीनंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याची सूत्रे भारतीय व्यक्तीकडे सोपवण्यात आली. या वर्षी आपण ७८वा भारतीय लष्कर दिन साजरा करत आहोत.
या दिवशी दिल्लीतील इंडिया गेटवरील 'नॅशनल वॉर मेमोरियल'मध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते. लष्करी परेडमध्ये आधुनिक शस्त्रे, टँक आणि क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले जाते. शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना आणि तुकड्यांना सेना पदके देऊन गौरवण्यात येते. देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शूरवीर सैनिकांना मानवंदना!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment