विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी अमृत संस्थेसोबत करणार समन्वयाने काम
अहिल्यानगर : जामखेड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक रवींद्र (मनोज) कुलकर्णी यांचे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. जामखेड शहर व परिसरातील गरजू आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या शुभेच्छांचे पत्र श्री. कुलकर्णी यांची भेट घेऊन दिले. त्यांच्या आगामी समाजकार्यास यश लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
या वेळी झालेल्या संवादात रवींद्र कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिकाधिक उपक्रम, प्रशिक्षण व विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अमृत ही संस्था संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करून समाजातील लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे, याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
अहिल्यानगर संपर्क : 9112228769.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment